ऑनलाईन टीम / पाटणा :
महाराष्ट्रापाठोपाठ आता बिहारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात वाढत असलेली रुग्ण संख्या लक्षात घेत, सरकारने 25 मे पर्यंत लॉकडाऊन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली की, बिहारमध्ये आता 25 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, सहयोगी मंत्रीगण आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर बिहारमधील लॉकडाऊन 25 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे सकारात्मक प्रभाव आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुढील 10 दिवस म्हणजेच 16 ते 25 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे.
- उच्च न्यायालयाने फटकारल्याने लावले होते लॉकडाऊन
पाटणा उच्च न्यायालयाने बिहार सरकारला फटकारल्यानंतर बिहारमध्ये 5 मे ते 15 मे दरम्यान, लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. हा कालावधी शनिवारी संपत आहे. त्यातच आता सरकारने आणखी 10 दिवस लॉकडाऊन वाढवले आहे. दरम्यान, राज्यात आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पण दर दिवशी 10 हजारच्या आसपास रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे निर्बंध वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.