वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विद्यमान अध्यक्ष सौरभ गांगुली तसेच सचिव जय शहा यांच्या पदाच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात यावी यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाने सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे.
भारतीय क्रिकेट मंडळाचे (बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष सौरभ गांगुली तसेच सचिव जय शहा यांना त्यांच्या पदाच्या कालावधीची तीन वर्षांची मुदत पूर्ण करण्यासाठी बीसीसीआयने आपल्या घटनेमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. गेल्या वर्षीच्या 1 डिसेंबर रोजी झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये घटनेमध्ये केलेल्या बदल प्रक्रियेला अधिकृत मंजुरी देण्यात आली होती.
या संदर्भात बीसीसीआयचे खजिनदार अरूण सिंग धुमाळ यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असून या अर्जामध्ये मंडळाच्या वार्षिक बैठकीमध्ये घटनेत केलेल्या बदलाला मंजुरी देण्यात आल्याचे नमूद केले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये गांगुली आणि जय शहा यांची अनुक्रमे अध्यक्ष आणि सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती.