उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड हा भाग एकेकाळी समृद्ध होता. तथापि गेल्या 50 वर्षांत त्याची वाताहत झाली आहे. आता या भागात बेरोजगार आणि दुष्काळाने थैमान घातल्याचे दिसून येते. मात्र, येथील काही महिलांनी या परिस्थितीवर मात करण्याचा निर्धार केला असून त्यांनी सरकारी योजनांचा लाभ घेत विविध उद्योगधंदे सुरू केल्याचे पाहावयास मिळते. यापैकी अनेक महिलांनी त्या फारशा शिकलेल्या नसूनही स्वतःच्या अंगभूत व्यवस्थापकीय कौशल्यामुळे हाती घेतलेल्या उद्योगधंद्यामुळे प्रगती साधून मोठी भरारी घेतल्याचेही अनुभवयास येते.
राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका अभियानाच्या माध्यमातून बुंदेलखंडातील अनेक गावांमध्ये महिलांचे स्वयंसाहाय्य गट स्थापन करण्यात आले आहेत. नरैनी या खेडय़ातील अशीच ही एक प्रेरणादायी कहाणी आहे. या खेडय़ातील महिलांनी एकत्र येऊन 2020 मध्ये 2 लाखाचे कर्ज या योजनेतून घेतले आणि डाळी तयार करून पॅक करण्याचा व्यवसाय सुरू केला. अशा प्रकारे 25 महिलांनी प्रसिद्ध बुंदेली तुरीची डाळ बनविण्याचे काम सुरू केले आहे. एक वर्षात त्यांची उलाढाल 10 लाख रुपयापर्यंत पोहोचली असून त्यामुळे या सर्व महिलांना रोजगार आणि सन्मान यांची प्राप्ती झाली आहे. आता ही कंपनी मोठी करून डाळ उत्पादन करणारी भारतातील मान्यवर कंपनी बनविण्याचे स्वप्न त्या पाहात आहेत.