विरुद्ध दिशेने वाहनधारकांची ये-जा : अपघाताचा धोका-वळसा घातल्यामुळे खिशाला कात्री
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले जातात. पहिल्या रेल्वे गेट परिसरात लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सचे घोंगडे गेल्या कित्येक वर्षापासून भिजत पडले आहे. पण बॅरिकेड्समुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वाहनधारक काँग्रेस रोडने विरोधी दिशेने जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
बॅरिकेड्सच्या अनावश्यक वापरामुळे वाहनधारकांच्या समस्येत भर पडत आहे. सध्या पेट्रोलचा दर 101 रुपये झाला आहे. अशातच बॅरिकेड्समुळे वळसा घालून जावे लागत असल्याने वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागत आहे. रहदारी पोलिसांवर कामाचा ताण वाढत असल्याने ठिकठिकाणी चौकांमध्ये बॅरिकेड्स लावून वाहतूक वळविण्यात आली आहे.
पहिला रेल्वेगेट येथे रहदारी नियंत्रणासाठी सिग्नल व्यवस्था तसेच रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. पण येथील ट्राफीक सिग्नल बंद ठेवून संपूर्ण रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे बेळगावकडून मंडोळी रोडला जाणाऱया वाहनधारकांना पहिल्या रेल्वेगेटजवळून वळसा घेता येत नाही. त्यामुळे त्या वाहनधारकांना पुढे जावून परत यावे लागते. परिणामी अर्धा किलो मीटरचे अंतर वाढते. दररोज मंडोळी रोडमार्गे जाणाऱया वाहनधारकांची संख्या मोठय़ाप्रमाणात असून प्रत्येक वाहनधारकाला इंधनाच्या खर्चाचा भुर्दंड बसत आहे. तसेच वेळ वाया जात असल्याचे निमित्त करून वाहनधारक काँग्रेस रोडने विरूद्ध दिशेने वाहने चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. पण यामुळे अपघातास निमंत्रण देण्यात येत असून अन्य वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यात यावा, अशी मागणी होत आहे.