सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टवरून जमाव प्रक्षुब्ध : गोळीबारात तिघे ठार : आमदाराचे निवासस्थान पेटविले
प्रतिनिधी/ बेंगळूर
सोशल मीडियावर केलेल्या कथित वादग्रस्त पोस्टवरून बेंगळूरमध्ये जनक्षोभ उसळला असून एका समाजाच्या संतप्त गटाने काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचे तीन मजली घर पेटवून दिले. तसेच पोलीस स्थानकात धुडगूस घालून साहित्याची नासधूस केली. अनेक वाहने पेटवून देण्यात आली असून त्यामध्ये चार पोलीस वाहनांचाही समावेश आहे. जमावाने सार्वजनिक मालमत्तेचीही प्रचंड हानी केली आहे. पोलिसांनी जमावावर नियंत्रण आणण्यासाठी हवेत गोळीबार केला. दरम्यान, तिघांचा गोळी लागून मृत्यू झाला. हिंसाचार प्रकरणी बुधवारी सायंकाळपर्यंत 147 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री कावल भैरसंद्र, के. जे. हळ्ळी व डी. जे. हळ्ळी येथे घडलेल्या या घटनेनंतर बेंगळूर शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी सकाळपर्यंत संपूर्ण शहरात जमावबंदी जारी करण्यात आली आहे.
बेंगळूर पूर्व भागातील पुलकेशीनगरचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचा भाचा नवीन याने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याचा आरोप असून यामुळे एका समाजाच्या भावना दुखावल्या. या पोस्टवरून संतप्त झालेला जमाव मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या कावल भैरसंद्र येथील निवासस्थानासमोर जमले. नंतर काही समाजकंटकांनी आमदारांच्या घरावर दगडफेक सुरू करत घोषणाबाजी केली. त्यानंतर काही वेळातच हजारोंच्या संख्येने जमाव तेथे दाखल होत. आमदारांचे निवासस्थान पेटविले. या घटनेत बंगला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यावेळी तेथे मोजकेच पोलीस उपस्थित होते. त्यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना न जुमानता समाजकंटकांनी धुडगूस घालत पोलीस वाहने, अग्निशमन बंब वाटेतच रोखले. त्यानंतर काही वेळेतच त्यांनी आपला मोर्चा के. जे. हळ्ळी पोलीस स्थानकाकडे वळविला. यावेळी वाटेत उभी असणारी अनेक वाहने पेटवून दिली. तर काही घरांवरही दगडफेक केली. के. जे. हळ्ळी पोलीस स्थानकासमोर उभ्या असलेल्या तीन पोलीस जीप, दुचाकींनाही आग लावली. येथे देखील अग्निशमन दलाच्या वाहनांना तेथे जाण्यापासून रोखण्यात आले. तसेच पोलीस स्थानकावर दगडफेक करून धुडगूस घातला.
पोलिसांकडून हवेत गोळीबार
यावेळी पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला प्रतिसाद न दिल्याने पोलिसांनी लाठीमार सुरू केला. त्यामुळे जमाव आणखी हिंसक झाल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. तरी सुद्धा हिंसाचारावर नियंत्रण येत नसल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. त्यावेळी तिघे जण ठार झाले. वाजिद खान (वय 20), यासीन पाशा (वय 20) अशी मृतांची नावे आहेत. आणखी एका 40 वर्षीय मृताचे नाव समजू शकले नाही. जमावावर नियंत्रण आणणाऱया पोलिसांवर आणि घटनेचे चित्रीकरण, वृत्तांकन करण्यासाठी केलेल्या पत्रकारांवरही समाजकंटकांनी दगडफेक केली. मध्यरात्रीनंतर जादा पोलीस फौजफाटा तैनात केल्यानंतर 2 च्या सुमारास जमावाला पांगविण्यात यश आले.
हिंसाचारात 200 हून अधिक जण जखमी झाले असून त्यामध्ये आंदोलक, पोलीस आणि पत्रकारांचाही त्यांच्यावर विविध इस्पितळांमध्ये उपचार केले जात आहेत. दोन पोलीस स्थानक हद्दीत संचारबंदी जारी करण्यात आली आहे तर संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात जमावबंदी जारी करण्यात आली आहे.
शहरात तणावपूर्ण शांतता
घटनेनंतर के. जी. हळ्ळी, डी. जे. हळ्ळी आणि कावल भैरसंद्र येथे तणावपूर्ण शांतता असून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हैदराबाद, केरळमधून प्रत्येकी तीन केएसआरपी तुकडय़ा मागविण्यात आल्या आहेत. तसेच जलद कृती दलाला देखील पाचारण करण्यात आले आहे. के. जी. हळ्ळीला जोडणारे सर्व संपर्क रस्ते बंद करण्यात आले आहेत.
हिंसाचारात सहभागी झालेले आणि सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकलेल्यांसह 147 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये आमदाराचा भाचा नवीन तसेच एसडीपीआय संघटनेचे नेते मुजम्मिल पाशा, फिरोज यांचाही समावेश आहे.
घटनेनंतर पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान ‘कावेरी’ येथे येडियुराप्पा यांची भेट घेऊन हिंसाचाराच्या घटनेबाबतची माहिती दिली. तसेच तेथील सुरक्षा व्यवस्थेची माहितीही दिली. हिंसाचारात सहभागी झालेल्यांना अटक करण्यात आली असून या घटनेला कारणीभूत ठरलेल्यांचाही शोध घेतला जात असल्याचे प्रवीण सूद यांनी येडियुराप्पांना सांगितले.
पक्षभेद विसरून घटनेचा निषेध
हिंसाचाराच्या घटनेचा पक्षभेद विसरून सर्व नेत्यांनी निषेध नोंदविला आहे. घटनेला कारणीभूत ठरलेल्यांवर कठोर कारवाई करावी. जमावाला हिंसाचार करण्यास प्रवृत्त करणाऱया आणि सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केलेल्यांना कोणत्याही प्रकारची सूट देऊ नये. नागरिक, पोलीस, पत्रकारांवर हल्ला करणे, अक्षम्य अपराध असल्याची प्रतिक्रिया माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मंत्री के. एस. ईश्वरप्पा व इतरांनी व्यक्त केली आहे.
मॅजिस्टेट चौकशीचे आदेश
कावल भैरसंद्र, के. जे. हळ्ळी आणि डी. जे. हळ्ळी येथील हिंसाचार प्रकरणाची बेंगळूर मॅजिस्ट्रेटच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केलेल्यांकडूनच वसुली केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई केली जाणार आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
मुस्लीम युवकांनी मंदिराला पुरविले संरक्षण
मंगळवारी मध्यरात्री बेंगळूरमध्ये हिंसाचार होत असताना काही मुस्लीम युवकांनी पुलकेशीनगर येथील अंजनेय मंदिराला मानवी साखळी करून संरक्षण पुरविले. समाजकंटकांकडून मंदिरावर कोणत्याही प्रकारे दगडफेक होणार नाही, यासाठी ते युवक प्रयत्नशील असल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
…तर गोळीबार करा !
शहरात पुन्हा हिंसक वातावरण निर्माण झाल्यास परिस्थिती नियंत्रणात येत नसेल तर जनतेच्या सुरक्षेसाठी समाजकंटकांवर गोळय़ा झाडण्यास मागेपुढे पाहू नका, असा आदेश मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिला आहे. हिंसाचाराची घटना पुन्हा घडणार नाही, यासाठी कोणतीही तडजोड करू नका. आणखी काही समाजकंटक फरार असून त्यांचा शोध घ्या. कारवाई करण्याबाबत पोलीस स्वतंत्र असून त्यामध्ये सरकार हस्तक्षेप करणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.