बेंगळूर/प्रतिनिधी
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नुकतेच बेंगळूरच्या एका विशेष न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, १२ ऑगस्ट २०२० रोजी शहरात हिंसाचार झाला होता, यासाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (एसडीपीआय) मोठा कट रचला होता. देशात जातीय हिंसाचार निर्माण करणे हा हेतू होता. दरम्यान यावेळी कॉंग्रेसचे आमदार आर. अखंड श्रीनिवास मूर्ती यांचे घर आणि दोन पोलीस ठाण्यांना आग लावण्यात अली होती. ऑगस्टमध्ये आमदार मूर्ती यांच्या पुतण्या नवीनने एक वादग्रस्त फेसबुक पोस्ट केली होती. यावरून जाळपोळ झाली होती. एनआयएच्या आरोपपत्रात असे म्हटले आहे, की एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया पोस्टवर हिंदू देवतांचा अपमान करण्याचा निंदनीय संदेश देऊन त्याला भडकवले आणि त्याला हिंसाचारासाठी प्रवृत्त केले.
कलम ३७०, सीएए, एनआरसी जारी करणे, बाबरी मशीद प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, तिहेरी तालक इत्यादी काही बाबींवर केंद्र सरकारच्या निर्णयावर बेंगळुरातील एसडीपीआय नेते नाराज होते. ते हिंसाचार घडविण्यासाठी संधीची वाट पाहत होते. जातीय असंतोष आणि त्यामुळे देशात अशांतता निर्माण झाली आहे, असे आरोपपत्रात म्हटले आहे.
आरोपपत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कर्नाटकचे गृहराज्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी हे एसडीपीआयचे षडयंत्र आहे आणि अशा संघटनांचे सोशल मीडिया हे एक सोपे साधन बनले आहे. बोम्माई यांनी पत्रकारांना सांगितले की, हे हँडलर (सोशल मीडियाचे) केवळ भारतातच नव्हे तर बाहेरही आहेत. मला विश्वास आहे की न्याय मिळेल. असे गृहमंत्री बोम्माई पत्रकारांना म्हणाले.