प्रतिनिधी/ बेळगाव
बेन्नाळी (ता. बेळगाव) येथे रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेसह दोघा जणांच्या मृतदेहावर सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करण्यात आली. प्रेम प्रकरणांतून ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.
गवंडी काम करणाऱया शिवाजी भीमा गाडीवड्डर (वय 31) याने रस्त्या शेजारील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले होते. त्यानंतर केवळ अर्ध्यातासात त्याच गावातील जयश्री राजू गाडीवड्डर (वय 30) या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
या दोन्ही प्रकरणांचा काकती पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. जोग्यानट्टी जवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करणाऱया शिवाजी व जयश्री यांच्यात सुत जुळले होते. शिवाजीच्या कुटुंबियांनी तीच्याशी जवळीक करु नकोस, असा समज दिल्याने मनस्तापातून त्याने आत्महत्या केली आहे. तर शिवाजीच्या मृत्यूच्या धक्क्याने जयश्रीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर पुढील तपास करीत आहेत.