प्रतिनिधी / कोल्हापूर
पंचगंगा नदी पात्रात शिवाजी पुलानजीक बेपत्ता झालेल्या रमेश यशवंत कदम (वय 37, मुळ रा. आब्रड, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) या तरुणाचा शुक्रवारी दुपारी मृत्यदेह मिळून आला. दोन दिवसापासून बेपत्ता होता. त्यांने नदीत उडी टाकून आत्महत्या केली की नदीवर आंघोळीला गेल्यावर पाय घसरुन पडून बुडून मृत्यु झाला, हे मात्र समजू शकले नाही. याबाबत करवीर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसातून समजलेली माहिती अशी, मृत रमेश कदम हा जुना बुधवार पेठेत भाडय़ाच्या खोलीत राहत असून, तो दसरा चौकातील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करीत होता. बुधवारी (दि.15) रात्री नेहमीप्रमाणे हॉटेल बंद झाल्यानंतर तो खोलीकडे झोपण्यास गेला. गुरुवारी पहाटे तो खोलीतून अचानक बेपत्ता झाला. तो कामावर न आल्याने हॉटेल मालकाने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. त्यामुळे हॉटेल मालक त्यांच्या खोलीकडे गेले असता तो खोलीमध्ये देखील मिळून आला नाही. त्यांनी शेजारील नागरीकांच्याकडे चौकशी केली असता त्यांना तो पहाटेच्या सुमारास खोलीतून निघून गेल्याबाबतची माहिती समजली. यावरुन हॉटेल मालकाने त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून तो अचानक बेपत्ता झाल्याबाबतची माहिती दिली. त्यावरुन त्यांच्या नातेवाईकांनी कोल्हापूरात त्वरीत आले. त्यांनी मृत रमेशचा शोध सुरु केला. तरी पण त्यांचा पत्ता लागेना.
याचदरम्यान शुक्रवारी दुपारी पंचगंगा नदी पात्रात एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यावरुन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जीवरक्षक पंकज लोळगे (वय 23,रा. उत्तरेश्वर पेठ) यांच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढला. बेपत्ता रमेशचा शोध घेत असलेल्या हॉटेल मालक आणि त्यांच्या नातेवाईकांना पंचगंगा नदीत एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना मिळाला असल्याबाबतची माहिती मिळाली. त्यावरुन त्या सर्वानी नदीकडे धाव घेतली. मिळून आलेला मृतदेह पाहताच तो रमेशचा असल्याचे उघड झाले.