गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची मागणी : अन्यथा आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
प्रतिनिधी / मडगाव
गोमंतकीयांच्या आरोग्याबद्दल बेपर्वा असलेले आणि कुठलीही माहिती नसलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना एक तर भाजपने पदावरून बदलावे किंवा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे. गोव्यात ऐन पावसाळय़ात सीमा खुल्या करून मुख्यमंत्र्यांनी गोवेकरांना कोरोनाच्या खाईत लोटले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वास्कोत कोरोनाचा जो सामाजिक फैलाव झाला आहे त्याला मुख्यमंत्रीच कारणीभूत असून गोव्याच्या सीमा सर्वांसाठी खुल्या केल्याचा हा परिणाम आहे. यामुळेच कोरोना प्रभावित भागांतून गोव्यात पर्यटक आले, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले आहे. सध्या मांगोर हिल या एका भागातच 46 रुग्ण सापडले आहेत. यामुळे गोवा सुरक्षित असून गोव्यात असलेले रुग्ण हे बाहेरच्या राज्यांतून आलेले असल्याचा जो दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता त्यातील फोलपणा उघड झाला आहे. हा कोरोना ‘मेड इन चायना’ नसून मांगोर हिलजवळ गर्दीत ग्रेड सेपरेटरसारख्या कामाचे उद्घाटन करून स्वतः ओढवून घेतलेला ‘होम मेड’ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रेड झोनमधून येणाऱया पर्यटकाना वेळीच अडवून न ठेवल्याचा हा परिणाम आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
केवळ गोवेकर, अत्यावश्यक वस्तूंना परवानगी द्या
जून व जुलै या दोन महिन्यांत फैलाव अधिक प्रमाणात होण्याचा धोका असल्याने गोव्याच्या सीमा सर्वांना खुल्या करण्याचा आत्मघातकी निर्णय घेण्याऐवजी केवळ गोवेकरांना आणि अत्यावश्यक वस्तू गोव्यात आणण्यासाठी तेवढी परवानगी द्या. सीमेवर प्रत्येक माणसाची तपासणी करा, तपासणीचा निकाल येईपर्यंत त्यांना एकाच जागी ठेवा. त्यातून कुणी ‘निगेटिव्ह’ आढळल्यास व तो गोमंतकीय असल्यास त्याला घरी आणि बिगरगोमंतकीय असल्यास सशुल्क विलगीकरणात ठेवा, अशा मागण्या सरदेसाई यांनी केल्या आहेत.
दुबईहून आलेल्या गोमंतकीयांना मिळालेली वागणूक उद्वेगजनक
दुबईहून गोव्यात परत आलेल्या गोमंतकीयांना दाबोळी विमानतळावर जी वागणूक मिळाली तिही उद्वेगजनक असून गरोदर महिलेलाही जो त्रास देण्यात आला तो माणुसकीला शोभणारा नव्हता. वरून या कृतीला आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी सहमती दिली आहे. ते पहिल्यास या अधिकाऱयांना एक तर गृह मंत्रालयाचे शिष्टाचार काय आहेत ते माहीत नसावेत किंवा ते मुद्दामहून तसे वागत असावेत, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. असे प्रकार यापुढे टाळण्यासाठी सरकारने लवकरात लवकर गोवाकेंद्रीत शिष्टाचार तयार करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.