बेळगाव / प्रतिनिधी
‘उडे देश का आम आदमी’ असे म्हणत उडानने बेळगाव विमानतळाला नवे पंख दिल्यामुळे वर्षभरात दीड लाख प्रवाशांनी विमान प्रवास केला. यामुळे जवळील हुबळी विमानतळाला याचा फटका बसला असून विमानाच्या उड्डाणांवरही याचा परिणाम जाणवत आहे. यामुळेच राज्यातील महत्त्वाचे चौथे विमानतळ म्हणून बेळगावच्या विमानतळाची नोंद करण्यात येत आहे.
2018 मध्ये बेळगावच्या सांबरा विमानतळावर केवळ 54 हजार 011 प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. तर 2019 मध्ये 1 लाख 50 हजार 071 प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे वर्षभरात तब्बल 1 लाख प्रवाशांची संख्या वाढल्याचे चित्र समोर येत आहे. याचबरोबर मागील वषी केवळ 880 विमानांनी बेळगावमधून भरारी घेतली होती. तर 2019 मध्ये 3 हजार 159 विमानांनी भरारी घेतल्याची नोंद उपलब्ध झाली आहे.
हुबळीपेक्षा ठरतेय सरस
मागील वषी बेळगावला सुरू असणारी स्पाईस जेटची सेवा हुबळीला घेऊन जाण्यात आली होती. यामुळे एकही विमानाचे उड्डाण या ठिकाणाहून होत नव्हते. परंतु यावर्षी मात्र बेळगावचे विमानतळ सरस ठरले आहे. मागील वषी हुबळीमध्ये 2 लाख 71 हजार 131 प्रवाशांनी प्रवास केला होता. तर यावषी 3 लाख 26 हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे. हुबळीच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याचे दिसून येत आहे. 2018 च्या नोव्हेंबर महिन्यात 50 हजार 253 प्रवाशांनी प्रवास केला होता. तर 2019 मध्ये 37 हजार 762 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे. त्यामुळे 13 हजारांनी प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.