प्रतिनिधी/ बेळगाव
प्रवासी संख्येत राज्यात दुसऱया स्थानी असलेल्या बेळगाव विमानतळावरून इतर शहरांची विमानसेवा पूर्ववत झाली आहे. एकूण 7 शहरांना बेळगावमधून विमानसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता पुन्हा एकदा काही तासांमध्ये इतर शहरे गाठता येत आहेत. तसेच लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या विमानसेवेने 51 हजारांचा प्रवासी टप्पा गाठला आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर 25 मार्चपासून देशातील प्रवासी विमानसेवा शटडाऊन करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीनंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर 25 मे पासून काही प्रमाणात विमानसेवा सुरू आहे. बेळगावमधून प्रारंभी अहमदाबाद त्यानंतर हैद्राबाद, बेंगळूर या शहरांना विमानसेवा सुरू केली होती.
या शहरांना सुरू आहे विमानसेवा
बेळगाव विमानतळावरून बेंगळूर, हैद्राबाद, मुंबई, पुणे, म्हैसूर, इंदूर व अहमदाबाद या शहरांना विमानसेवा सुरू केली आहे. तर बेळगाव-अजमेर ही इंदूर येथून कनेक्टिंग आहे. बेंगळूर- 4, हैद्राबाद- 3, मुंबई- 2 विमाने उपलब्ध आहेत. तर सर्वांत लोकप्रिय ठरलेली तिरुपती व कडप्पा या शहरांना विमानसेवा सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.
प्रवासी संख्येत राज्यात दुसऱया स्थानी
लॉकडाऊननंतर देशातंर्गत विमान प्रवास थंडावला होता. त्यातही बेळगावमधून प्रवास करणाऱयांची संख्या अधिक होती. बेंगळूरनंतर राज्यात सर्वांधिक प्रवासी संख्या ही मंगळूर येथे होती. परंतु बेळगावने मंगळूरला मागे टाकत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे आतापर्यंत 51 हजार 650 प्रवाशांनी बेळगावमधून प्रवास केल्याचे नोंद करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ : राजेशकुमार मौर्य (संचालक, बेळगाव विमानतळ)
मागील 110 दिवसांपासून बेळगाव विमानतळावरून 51 हजार 650 प्रवाशांनी प्रवास केला. तिरुपती व कडप्पा ही दोन शहरे वगळता इतर सर्व शहरांना विमानसेवा पूर्ववत करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.