प्रतिनिधी /बेळगाव :
आतापर्यंत जिल्हय़ात 139 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी काही जणांचे अहवाल आले. मात्र त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे बेळगाव जिल्हय़ाला गुरुवारी दिलासा मिळाला आहे. असे असले तरी राज्यात मात्र 115 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे राज्याचा आकडा 2533 वर पोहोचला आहे.
परराज्यातून येणाऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्याही वाढत चालली आहे. मंगळवारी तब्बल 13 रुग्ण आढळले होते. त्यानंतर बुधवारी 4 जण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे पुन्हा भितीचे वातावरण पसरले होते. मात्र गुरुवारी एकही रुग्ण आढळले नसल्यामुळे काहीसी भिती कमी झाली आहे. केरळ, मुंबईहून आलेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.
जिल्हय़ात आतापर्यंत 139 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 836 जणांचा अहवाल अजून येणे बाकी आहे. कोरोनाबाधित असलेले 94 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोना बरे होण्याची संख्याही वाढली आहे. 2883 जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 2406 जणांचे 14 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण झाले आहे. 5 हजार 755 जणांचे 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण झाले आहे. आतापर्यंत 9 हजार 800 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यामधील 8 हजार 649 जण निगेटिव्ह आले आहेत. 139 जण पॉझिटिव्ह तर बागलकोट जिल्हय़ातील 8 जणांवर बेळगाव येथेच उपचार सुरू आहेत. सध्या 52 कोरोनाबाधितांच्यावर उपचार सुरू आहेत.
गुरुवारी दोन्ही सत्रामध्ये एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने दिलासा व्यक्त केला आहे. आता परराज्यातून आलेल्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवले जात आहे. त्यामुळे भितीचे काहीच कारण नाही, असे सांगण्यात येत आहे. असे असले राज्यातील अंतर्गत वाहतूक सुरू झाल्यामुळे एका जिल्हय़ातून दुसऱया जिल्हय़ात आल्यामुळे काहीसी संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.