सर्वाधिक प्रवासी संख्या असूनही दुर्लक्ष : कृषी उडान सेवेत हुबळी-म्हैसूर विमानतळांचा समावेश
प्रतिनिधी /बेळगाव
कृषी उत्पादनांची वेळेत वाहतूक व्हावी, यादृष्टीने नागरी उड्डाण मंत्रालयाच्यावतीने कृषी उडाण योजना आखली होती. यातील दुसरा टप्पा नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये हुबळी व म्हैसूर या दोन विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे. प्रवासी संख्येत आघाडीवर असणाऱया बेळगाव विमानतळाची ही संधी हुकली आहे.
केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कृषी उडाण 2.0 ही योजना लाँच केली. या योजनेतून शेतकऱयांचा कृषी माल 50 टक्के कमी दरामध्ये वाहतूक केला जाणार आहे. यामुळे अवघ्या काही तासांमध्ये देशासोबतच परदेशातही कृषी माल पोहोचविणे सोयीचे ठरणार आहे. ज्या विमानतळांची निवड झाली आहे. अशा विमानतळांवर कृषी कार्गोसाठी स्वतंत्र टर्मिनल सुरू करण्यात येणार आहेत. सन 2021-22 या वर्षाकरिता देशातील इतर विमानतळांसह हुबळी विमानतळावर कृषी कार्गो सुरू केले जाणार आहे. 2022-23 साठी इतर विमानतळांसह म्हैसूर येथे टर्मिनल उभारले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अव्वल विमानतळाची संधी हुकली
राज्यात आंतरराष्ट्रीय विमानतळांसह इतर लहान विमानतळे आहेत. प्रवासी संख्येचा विचार करता बेंगळूर व मंगळूर या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर सर्वाधिक प्रवासी संख्या ही बेळगाव येथे आहे. दररोज हजारच्या आसपास प्रवासी विमानतळावरून ये-जा करतात. त्यामुळे प्रवासी संख्या मोठी असूनही या विमानतळाचा समावेश कृषी उडान सेवेमध्ये झालेला नाही.
बेळगाव जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात कृषी मालाचे उत्पादन होते. बेळगाव जिल्हय़ात उत्पादित केलेला कृषी माल देशभरातील विविध शहरांमध्ये पोहोचविला जातो. परंतु हा कृषी माल वेळेत पोहोचविण्यासाठी कृषी कार्गोची आवश्यकता आहे. बेळगाव जिल्हय़ाला लागूनच कोल्हापूर व सांगली जिल्हा असून येथेही मोठय़ा प्रमाणात कृषी उत्पादन घेतले जाते. बेळगाव विमानतळाचा समावेश कृषी उडानमध्ये झाला असता तर बेळगावसह या दोन्ही जिल्हय़ांतील शेतकऱयांना फायदा झाला असता. या सेवेसाठी आता 2 ते 3 वर्षे वाट पहावी लागणार आहे.