वार्ताहर/ किणये
बेळगुंदी- राकसकोप रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. वारंवार सांगूनही रस्ता दुरुस्तीकडे कानाडोळा केला जात असल्यामुळे सोमवारी सकाळी 11 च्या दरम्यान बेळगुंदी राकसकोप पंचक्रोशीतील तरुणांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती शिवाजी कंग्राळकर, नारायण झंगरुचे व अमोल जाधव यांनी दिली आहे.
नुकतीच या रस्त्याबाबत राकसकोप येथे कार्यकर्त्यांची बैठक झाली असून या बैठकीत मोर्चा काढण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. बेळगाव ते राकसकोप हा रस्ता पश्चिम भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. बोकनूर, बेळगुंदी, सोनोली, यळेबैल, राकसकोप, बिजगर्णी, कावळेवाडी, बेळवट्टी, इनामबडस, आदी गावातील वाहनधारकांचे या रस्त्यावरून वर्दळ असते.
गेल्या पाच सहा वर्षापासून खड्डेमय रस्त्याचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतो आहे. बोकनूर क्रॉसपासून राकसकोप गावापर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून सुमारे एक ते दीड फुटापर्यंत खड्डे पडलेले आहेत. बेळगुंदी नाल्याजवळ तसेच सोनोली गावच्या नाल्याजवळ रस्ता पूर्णत: उखडून गेला असून या ठिकाणी रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झालेले आहे. अशा रस्त्यातून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच ये जा करावी लागत आहे.
गेल्या वषी रस्त्याच्या दुरुस्तीचे केवळ पॅचवर्क करण्यात आले. पण या भागातील नागरिकांसाठी हा महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता असल्यामुळे या रस्त्याचे आता डांबरीकरण होणे गरजेचे आहे. या परिसरातील शेतकरी, कामगार वर्ग बेळगावला ये जा करीत असतात, रात्रीच्यावेळी रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक ठरू लागले आहे. शेतकरी वर्गही या खड्डय़ांच्या रस्त्याला वैतागून गेले आहेत.
यंदा झालेल्या अतिवृष्टीच्यावेळी सोनोली नाल्याजवळील रस्त्यावर पाणी आले होते. यामुळे बेळगुंदी व सोनोली गावचा संपर्कही तुटला होता. तसेच सोनोली गावच्या मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी आले होते. गतवषी झालेल्या महापुराच्या वेळीही अशाच परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागला होता. लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याने या भागातील काही तरुणांनी बैठक घेऊन मोर्चा काढण्याची तयारी केली आहे.
सोमवारी सकाळी राकसकोप येथून मोर्चाला सुरुवात करण्यात येणार आहे व बोकनूर क्रॉस या ठिकाणी येऊन या मोर्चाची सांगता करण्यात येणार आहे. मोर्चात या भागातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीला शिवाजी कंग्राळकर, नारायण झंगरुचे, अमोल जाधव, लक्ष्मण गाडेकर, रामलिंग हलकर्णीकर, सुरेश अष्टेकर, मोनाप्पा भास्कर, राहुल शहापूरकर, परशराम कणबरकर, प्रकाश सुतार, भरमा गावडे, दीपक नाईक, उत्तम झंगरुचे, परशराम कित्तूरकर, अजित मोरे, संजय मासेकर, प्रकाश बेळगांवकर, प्रशांत हेरेकर, रामा केसरकर, खाचू सुपे आदी उपस्थित होते.