कपिलेश्वर उड्डाणपुलावर होणाऱया सततच्या केंडीने नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी शनिमंदिर व कपिलेश्वर उड्डाणपूल परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. यामुळे वाहने या कोंडीमध्ये अडकून पडली होती. वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यामुळे ही समस्या सोडवावी, अशी मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.
शनिमंदिर रोड परिसरात बेशिस्तपणे चार चाकी वाहने लावली जात आहेत. यामुळे कपिलेश्वर उड्डाणपुलावरून आलेली वाहने शनिमंदिर कॉर्नर येथे अडकून राहत आहेत. आधीच येथील रस्ता अरुंद आहे आणि त्यातच वाहनांचे पार्किंग केले जात असल्यामुळे ही कोंडी होत आहे. बुधवारी दुपारी या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. महानगरपालिकेची कचरा उचलणारी गाडी एका बाजूला लावण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडली.
दुचाकी चालकांचा बेशिस्तपणा
वाहतूक कोंडी असतानाही त्यामध्ये दुचाकी चालक वाहने रेटत असल्याचे चित्र वरचेवर पाहायला मिळत आहे. दुसऱया बाजूने येणाऱया वाहनांमधूनही दुचाकी चालक वाहने दामटत असल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी रस्त्याच्या एकाच बाजूने वाहने हाकणे गरजेचे बनले आहे.
रहदारी पोलिसांची नेमणूक करा
शहापूर-वडगाव परिसरातून शहरात येणारे सर्रास नागरिक कपिलेश्वर उड्डाणपुलावरून प्रवास करतात. परंतु सध्या होणाऱया वाहतूक कोंडीमुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे शनिमंदिर परिसरात कायमस्वरुपी रहदारी पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.