ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखमधील सीमावाद शांततेत सोडवण्यासाठी चीनने तयारी दर्शवली आहे. काल दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये या वादावर साडेपाच तास बैठक झाली. शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात ही बैठक पार पडल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली.
पूर्व लडाखमध्ये सुरू असलेला वाद हा शांततेद्वारे आणि द्विपक्षीय करारानुसार सोडवण्यात येईल. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्यासाठी सीमा भागात शांतता आवश्यक आहे. त्यामुळे तणावाच्या मुद्यांवर चर्चर्चेतून तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनचे एकमत झाले आहे. या बैठकीत काय झाले याचा उल्लेख न करता एका लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘भारत व चीन यांच्या अधिकाऱ्यांमध्ये यापुढेही लष्करी व राजनैतिक मार्गाने चर्चा सुरू राहील. त्यामुळे सीमावाद मिटवण्यास मदत होईल.’
चीनच्या ताब्यातील मोल्डो हट येथे ही बैठक पार पडली. १४ कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. चीनकडून मेजर जनरल लिऊ लिन या बैठकीत सहभागी झाले होते.