ठेकेदाराच्या लेखी आश्वासनानंतर रास्तारोको आंदोलन मागे :
वार्ताहर / कंग्राळी खुर्द
दोन महिन्यात रस्ता पूर्ण करण्याच्या ठेकेदाराच्या लेखी आश्वासनानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. बॉक्साईट रोड ते कंग्राळी खुर्द येथील शिवमूर्तीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. Aमात्र रस्त्याचे काम अर्धवटच आहे. याचा त्रास 20 ते 25 गावच्या नागरिकांना होत आहे. या विरोधात जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, ग्राम विकास आघाडी अध्यक्ष आर. आय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
बुधवारी सकाळी 11 वाजता बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर, जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे, ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, ता. पं. माजी अध्यक्षा अर्चना अलगोंडी, ग्रा. पं. माजी सदस्य चेतक कांबळे, यल्लाप्पा पाटील, महेश्वरी सोमाजीचे, संगीता बागेवाडी, वैशाली तेली, सुरेखा पाटील, सविता तट्टे, भारता यळ्ळूरकर, सुनीता काकतकर, सुरेखा यळ्ळूरकर, शांता हुंदरे, प्रीती कांबळे, छाया देसाई यांनी ठाण मांडले. बाजार समिती प्रवेशद्वार ग्रा. पं. विकास आघाडी अध्यक्ष आर. आय. पाटील, ऍड. सतीश बांदिवडेकर आणि त्यांच्या सहकाऱयांनी रोखून धरले.
रास्तारोको आंदोलनामुळे कंग्राळी खुर्द रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. आंदोलनस्थळी मार्केट यार्डमधील व्यापारी, रिक्षाचालक, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित एपीएमसी पोलीस स्थानकाचे निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी रस्ता ठेकेदार आणि रस्ताकामाचे अभियंता यांना बोलावून घेतले. यावेळी ठेकेदार शिवकुमार तळमपल्ली यांनी, कोरोनामुळे वेस्ट बंगालचे कामगार परत गेले. शिवाय सिमेंटचा रस्ता करण्यात आल्याने त्यावर 20 ते 25 दिवस वाहने चालविण्यात येत नाहीत. रस्त्याच्या पूर्वेकडच्या काही जमीन मालकांनी स्टे-ऑर्डर आणल्यामुळे रस्ताकामाला विलंब झाल्याचे सांगितले. या रस्त्याचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र या आश्वासनानंतर आंदोलकांचे समाधान झाले नाही. कारण याआधीसुद्धा असेच आश्वासन देण्यात आले होते. यासाठी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी दोन महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण करू असे लेखी लिहून देण्याचे सांगितले. त्याप्रमाणे ठेकेदाराने लेखी लिहून दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.
रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेक समस्या
सरस्वती पाटील
यावेळी बोलताना जि. पं. सदस्या सरस्वती पाटील म्हणाल्या, कर्नाटक-महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांशी जोडणारा हा बाजार समितीचा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात. यामध्ये शेतकरी बांधवांनी उत्पादित केलेल्या मालाची वाहने अधिक असतात. त्यांना रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व नागरिकांनी वेळेवर शासनाचा सर्व कर भरूनसुद्धा प्रशासन नागरी सुविधा पुरविण्यात मात्र चालढकल करत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
रस्त्यावरील खड्डे बुजवून अडथळे दूर करा
आर. आय. पाटील
रस्त्याच्या कामाआधी रस्त्यावर जे खड्डे पडले आहेत ते बुजवून रस्त्यावरचे अडथळे दूर करावेत. लवकरात लवकर रस्ताकामाला सुरुवात करून ते पूर्ण करावे. शिवाय या रस्त्यासाठी किती निधी मंजूर झाला, किती खर्च झाला आणि रस्त्याचा आराखडा दाखवावा, अशी मागणी केली.
रस्त्यासंदर्भात प्रतिनिधींशी चर्चा
अरुण कटांबळे
जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे आंदोलनस्थळी बोलताना म्हणाले, या रस्त्याचा जवळजवळ 50 गावांशी संबंध येतो. शिवाय रस्त्यासंदर्भात आमदार सतीश जारकीहोळी, अनिल बेनके, लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी चर्चा केली आहे. या रस्त्यासाठी सुंदर शहरअंतर्गत निधी खर्च करण्यात आला आहे. तरीही रस्ता ठेकेदाराने लवकरात लवकर रस्ताकाम पूर्ण करावे, अशी मागणी केली.
यावेळी मार्कंडेय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बी. डी. मोहनगेकर, तालीम मंडळाचे अध्यक्ष परशराम पाटील, व्ही. बी. पाटील, मनोहर पाटील, निंगोजी पाटील, गजानन पाटील, प्रशांत निलजकर, अनिल सूर्यवंशी, परशराम मेंडके, जी. जी. कंग्राळकर, सचिन शिवनगेकर, नारायण थोरवत, परशराम पाटील, अडत व्यापारी टी. एस. पाटील, संभाजी होनगेकर, राजू पाटील, विनायक पाटील, दीनानाथ मुतगेकर, पंडित पाटील, मधू पाटील, लक्ष्मण सांबरेकर, संभाजी पाटील, परशराम मेंडके यांच्यासह कंग्राळी खुर्द, अलतगा, मार्कंडेयनगरवासीय मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, पीएसआय गुर्लहोसूर कृष्णवेली, इएसआय एस. एन. पाटील आणि त्यांच्या सहकाऱयांनी बंदोबस्त ठेवला होता.