विजयकुमार दळवी यांचे प्रतिपादन : 17 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात
प्रतिनिधी /बेळगाव
संस्कृती आणि साहित्य माणसाला समृद्ध करून माणूस म्हणून जगायला शिकविते. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ या महान संतांनी साहित्यातील गोडी अधिक दृढ केली. लेखन ही तपश्चर्या असून सतत नवनवीन लिहिले पाहिजे. प्रत्येकाने मनन, चिंतन आणि वाचन वाढवून दैनंदिन संवादामध्ये बोलीभाषेचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन लेखक विजयकुमार दळवी यांनी केले.
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघातर्फे आयोजित 17 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात ते संमेलनाध्यक्षपदावरून बोलत होते. येथील शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात रविवारी हे संमेलन उत्साहात झाले.
व्यासपीठावर उद्घाटक डी. जी. पाटील, ग्रा. पं. माजी सदस्य रमेश धामणेकर, ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, सदस्य प्रमोद पाटील, शांता काकतकर, महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक बबन कानशिडे, बाबागौडा पाटील, दुद्दाप्पा बागेवाडी, शिवाजी सायनेकर, रघुनाथ मुरकुटे, बाबुराव मुरकुटे, शांताराम कुगजी, प्रकाश पाटील, संजय मासेकर, कल्लाप्पा भोगण आदी उपस्थित होते.
विजयकुमार दळवी म्हणाले, सीमाभागातील मराठी शाळा टिकविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, याबरोबर मराठी भाषा वाढविण्यासाठी आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने मातृभाषेतून शिक्षण घेतले पाहिजे, मराठी भाषा मुळात अभिजात भाषा आहे. मात्र, तिला अभिजात म्हणून कागदोपत्री दर्जा मिळणे आवश्यक आहे. याकरिता सरकारदरबारी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी दिवंगत एल. आय. पाटील संमेलननगरीचे आणि दिवंगत परशराम बेडका सभागृहाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत व स्फूर्तीगीत सादर केले. संत तुकाराम महाराज, शिवछत्रपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सरस्वती प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक प्रा. सी. एम. गोरल यांनी केले. स्वागत रमेश धामणेकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन झाले. यावेळी डी. जी. पाटील यांनी उद्घाटन करताना कोरोनासारख्या संकट काळात येळ्ळूर साहित्य संघाने संमेलन भरविण्याची परंपरा जपली असल्याचे सांगितले. यावेळी बेळगाव बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऍड. सुधीर चव्हाण यांचा संमेलनाध्यक्ष विजयकुमार दळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी येळ्ळूर केंद्रात दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या संजना चिट्टी (शिवाजी विद्यालय), द्वितीय संकुल पवार (नेताजी हायस्कूल), तृतीय राजश्री हलगेकर (महाराष्ट्र हायस्कूल) यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
माणसात राहुया, आनंदात राहुया आणि मनाची मशागत करून अभ्यासात रमुया, असे सांगत पालकांना आपल्या मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवा, असा संदेश दिला. यावेळी साहित्यरसिक, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन रणजित देसाई यांनी केले. डॉ. तानाजी पावले यांनी आभार मानले.
हसल्याने माणसाचे जीवन खुलते
संमेलनातील दुसऱया सत्रात राधानगरी (कोल्हापूर) येथील संभाजी यादव यांनी ‘हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा’ या कार्यक्रमातून अनेक किस्से सादर करून रंगत आणली. दैनंदिन जीवनात आपल्या आजूबाजूला विनोद घडत असतात. ते आपल्याला टिपता आले पाहिजेत, असे सांगत विनोदी किस्से सादर केले. शैक्षणिक समस्या, कलाकारांच्या नकला, पशु-पक्ष्यांचे आवाज, ऑर्केस्ट्रातील वाद्ये, असे मौखिक आवाज रसिकांसमोर सादर केले. याबरोबर फॅशन, टीव्ही, मोबाईल अशा विविध विषयांवर हसत-खेळत प्रबोधन केले. ‘जगण्यासाठी दिवस आपला रडण्यासाठी नाही, उद्याचा दिवस कुणी बघितलाय, घडीचादेखील दिवस नाही, असे सांगत विविध विनोदी किस्से सादर केले.
संमेलनातील ठराव
- महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद मिटावा यासाठी जो दावा महाराष्ट्र सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे, त्याकडे महाराष्ट्र सरकारने आपली सर्व शक्ती उभी करावी, न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराका÷ा करावी.
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा, यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून त्याचा विचार करून सरकारने त्वरित मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करावा.
- सध्या युपेन व रशिया यांच्यातील संघर्षामुळे जगामध्ये अशांतीचे व भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुद्धाचा भडका उडतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी त्वरित हे युद्ध थांबविण्यात यावे.
- कर्नाटक राज्यातील मराठी भाषिक गेली अनेक वर्षे आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढत आहेत. परिपत्रके आणि प्रशासकीय कागदपत्रे आपणाला मराठीतून मिळावीत, अशी मागणी आम्ही करीत आहोत. ही मागणी राज्यघटनेला अनुसरूनच आहे आणि म्हणून कर्नाटक राज्य शासनात ही मागणी मान्य करावी आणि मराठी भाषिकांना मराठीतून परिपत्रके, कागदपत्रे द्यावीत.
येळ्ळूर साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी हे चार ठराव मांडले. या ठरावांना उपस्थित रसिकांनी टाळय़ांच्या गजरात अनुमोदन दिले.