सद्गुरुंचे स्तवन करताना नाथमहाराजांनी त्यांना वैद्य असे म्हटले आहे कारण त्यांच्याशिवाय दुर्धर अशा भवरोगाची बाधा दूर करण्यास इतर कोणीही समर्थ नाही. त्यांनी नुसती नजर जरी टाकली तरी मनुष्य रोगमुक्त होतो. भवरोगाच्या उन्मादाने मनुष्य आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक या त्रिविध तापांनी होरपळत असतो. ‘मी’ आणि ‘माझे’ या कल्पनेवर आधारित वायफळ बडबड करत असतो. तो कडू विषासारखे कडू बोलत असतो. असा हा जबरदस्त रोग पाहून, सद्?गुरुरूपी हुशार वै?द्य पुढे सरसावतो आणि कृपादृष्टीने पाहूनच त्याला तत्काळ बरे करतो. नंतर मायेच्या मागे लागतो तेव्हा ती नुसत्या धाकानेच पळून जाते आणि भवरोग संपूर्ण बरा होतो.
अवधुतांच्या चोवीस गुरुंची लक्षणे ऐकून उद्धवाची भावना ब्रह्ममय झाली होती. तो मनात म्हणाला, ब्रह्माने हे सर्व जग व्यापलेले आहे. माझ्या ठायीही ते अंतर्बाह्य व्यापून आहे. परंतु हे माझे मलाच अद्याप समजले नाही. ते कसे समजून घ्यावे काही कळत नाही. उद्धवाच्या मनातली चिंता भगवंतांना समजली आणि त्यावरचा उपाय सांगण्यास त्यांनी आरंभ केला. ते म्हणाले, उद्धवा, कर्म करताना फार सावधपणाने वागले पाहिजे. नेहमीची आणि विशेष प्रसंगी करावयाची कर्मे करणे आवश्यक आहे.
ते फलाची अपेक्षा न धरता, यथाविधि आचरावे. नित्यकर्म जसजसे वाढत जाते तसतसे नैमित्तिक कर्मही वाढू लागते. त्यातून विषयप्राप्तीच्या इच्छेने काम्य कर्म करायला कधी सुरुवात होते ते कळतही नाही. त्यामुळे हळूहळू नित्य, नैमित्तिक कर्मे अपेक्षेने केली जातात आणि त्यांचे निषिद्ध कर्मात रूपांतर होते. असे होऊ नये म्हणून फलाचा अभिलाष न धरता नित्य, नैमित्तिक कर्म निरपेक्षतेने करून कृष्णार्पण करावीत. ती मनाला निर्मळ करणारी असून, परमार्थाचे मुख्य साधन आहेत. त्यामुळे जन्माचे साफल्य होते आणि परमार्थाचे फळ मिळते. आपण निषिद्ध कर्म करतो आहोत असे लक्षात आले की लगेच हरिनामाची गर्जना करावी.
म्हणजे निषिद्ध कर्मे पळून जातात. पुढे म्हणाले, या पद्धतीने वागत गेलास तर तुझे चित्त शुद्ध होऊन तुझ्यातील सत्त्वगुणाची वाढ होईल. त्यामुळे तुला माझ्याशिवाय इतर गोष्टी तुच्छ वाटून तू सतत माझे चिंतन करू लागशील आणि सर्वत्र मीच भरून राहिलो आहे याची अनुभूती तुला येऊ लागेल. हे जरी मी तुला सांगितले तरी ही गोष्ट घोटवून घेण्याचे काम सद्गुरु करतात.
सद्गुरुंवर भक्ती जडण्यासाठी अहिंसा, सत्य, इत्यादीचे अविश्रांत आचरण करावे. म्हणजे गुरुभक्तीवर शिष्याचे अत्यंत प्रेम जडते, तो रात्रंदिवस गुरुचेच चिंतन करू लागतो. सद्गुरुशिवाय
ब्रह्मज्ञान कधीच प्राप्त व्हावयाचे नाही. श्रद्धापूर्वक सद्गुरुच्या हाताने, ज्ञाते आत्मसुखाला पात्र होतात. आत्मज्ञान संपादन करण्याकरिता सद्?गुरुची सेवा करून संत सज्जन शांत होतात. कारण सद्गुरु हा आनंदघन असतो. त्याना चिद्ªपाचे ज्ञान झालेले असल्याने तो परिपूर्ण चिद्ªपच असतो. गुरु आणि ब्रह्म भिन्न नव्हेत
पुढे भगवंत म्हणाले उद्धवा, उत्तम शिष्य होण्यासाठी कोणते गुण लागतात ते तुला सांगतो. शिष्याला मानसन्मानाची बिलकुल आवड नसते. तो मानाभिमान सोडून हीनदीन होऊनच राहतो. ज्यांचा अभिमान बळावलेला असतो, तेच नेहमाr सन्मानाची अपेक्षा करतात. सन्मानाची इच्छा न करणे हेच शिष्याचे ‘पहिले’ लक्षण होय. शिकलेल्या लोकांना देहाभिमानामुळे दुसऱयाविषयी मत्सर वाटतो व वैर उत्पन्न होते. ज्ञानाभिमान तर आणखीनच घात करतो. देहाभिमान आणि ज्ञानाभिमान नसणे, दक्षता, निर्ममता, आप्तपणा, निश्चळता, परमार्थाविषयी चढत्या श्रेणीत वाटणारे प्रेम, अनसूया आणि मितभाषीपणा ही नऊ मण्यांची माळ त्याच्या हृदयकमली वास करते. शिष्याचे बोलणे परिपक्व झालेल्या वाणीतील अमृता समान असते. आत्मसुख मिळण्याचे साधन तो एकाच शब्दात विचारतो. या सुंदर गुणांची माळ जो शिष्य सद्गुरुच्या कंठात घालील, तो हा हा म्हणता सायुज्य सिंहासनावर बसतो.
क्रमशः