प्रतिनिधी/ रत्नागिरी \
जिल्ह्य़ातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या व स्थानिकांमध्ये वाढत चाललेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी बुधवारी नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला. ‘ब्रेक द चेन’चा निर्धार करत जिल्हावासीयांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन केल्याचे दिसून आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. रस्त्यांवरही वाहने व नागरिकांची तुरळक वर्दळ दिसून आली.
कोरोनाच्या वाढत्या फैलावच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी 1 जुलै ते 8 जुलै या कालवधीत कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. बुधवारपासून जिह्यात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. ‘ब्रेक द चेन’ च्या हेतूने करण्यात आलेल्या या लॉकडाऊनच्या विरोधात गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडीया तसेच व्यापारी वर्गातून विरोधी सूर उमटत होते. मात्र बुधवारी पहिल्या दिवशी सर्वच तालुक्यांमध्ये नागरीक व व्यापारी वर्गाने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचे चित्र ठळकपणे समोर आले आहे.
‘लॉकडाऊन’ ची कडक अंमलबजाणी होणार असल्याची चर्चा दोन दिवसांपासून सर्वत्र सुरू होती. त्याचा धसका घेऊन गेले दोन दिवस रत्नागिरीसह सर्वच बाजारपेठांमध्ये जत्रेचे स्वरूप आले होते. त्यामुळे लॉकडाऊनला कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागले होते. बुधवारी सकाळपासूनच रत्नागिरीतील वर्दळ थंडावली. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनेच रस्त्यावर फिरताना दिसून येत होती. दूध, भाजीपाला आणि छोटी दुकाने सोडून बाकी सर्व बाजारपेठ बंद होती. बहुतांश नागरिकांनाही घरातच राहणे पसंत केले.
व्यापारी महासंघानेही 100 टक्के दुकाने बंद ठेवली. यामुळे शहरातील गजबजलेले सर्वच परिसर वर्दळीविना सामसूम झालेले दिसले. शहरातील जयस्तंभ, बसस्थानक, राम आळी, मारुती आळी, गोखले नाका, लक्ष्मी चौक, मारुती मंदिर, साळवी स्टॉप तर शहराबाहेर जे. के. फाईल्स, कुवारबाव, आदी गजबजणारी ठिकाणेही शांत होती. अनावश्यक वाहने घेऊन फिरणाऱयांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी शहरात साळवी स्टॉप, मारूती मंदिर, जयस्तंभ, परटवणे येथे नाकाबंदी ठेवलेली आहे. त्या ठिकाणी वाहनधारकांची कसून चौकशी केली जात आहे.
आपत्ती, अत्यावश्यक सेवा, शासकीय कार्यालये सुरूच
आपत्ती व्यवस्थापन व अत्यावश्यक सेवाची आस्थापना व कार्यालये 100 टक्के उपस्थितीसह तर अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालये 10 टक्के उपस्थितीसह सुरु ठेवण्यात आली होती. तसेच पाणी पुरवठा, सांडपाणी निचरा आणि स्वच्छता करणाऱया यंत्रणा तसेच बँका, टपाल, कुरियर, दूरध्वनी आणि इंटरनेट पुरवणाऱया आस्थापना, ऑनलाईन शिक्षण, आय.टी. आस्थापना, ई-कॉमर्स जसे ऍमेझॉन यांच्या सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत.
वर्तमानपत्राच्या विक्रीला अडसर
लॉकडाऊनच्या काळात प्रसारमाध्यमांचे काम नेहमीप्रमाणे सुरू राहील असे जाहीर करण्यात आले असतानाही अनेक ठिकाणी पेपर विक्रीस मज्जाव करण्यात आला. याबाबत वरीष्ठ अधिकाऱयांना विचारले असता अशा कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या आदेशांबाबत स्पष्टता व समन्वयाचा अभाव दिसून येत असल्याने अनेक पेपर विक्रेत्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
चिपळुणात कडकडीत
चिपळूणात औषधालये वगळता अन्य दुकाने बंद होती. काही ठिकाणी भाजी व मटण विक्री सुरू होती. मात्र ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद होता. शहरातील व्यापारी संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार किराणा दुकाने बंद होती. यामुळे नेहमी गजबजणारे रस्ते निर्मनुष्य झाले होते. शहरातील चिंचनाका, गांधीचौक, भेंडीनाका, बहाद्दूरशेख नाका, गोवळकोट, खेर्डी आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विनाकारण फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरातील बुरुमतळी येथील एका व्यावसायिकाने हॉटेल उघडले होते. मात्र नगर परिषदेच्या पथकाने समज दिल्यानंतर ते बंद करण्यात आले. दरम्यान, शहराप्रमाणे अलोरे-शिरगाव, सावर्डे बाजारपेठेतही औषधालये वगळता पूर्ण बंद होती. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
दापोलीत दुकान उघडल्याने दंड
दापोलीतही सर्व दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली होती. रस्त्यावर शुकशुकाट होता. सकाळी सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत दुधाची दुकाने उघडी ठेवण्यात आली होती. दापोली बसस्थानकातील दुकानाचा मालक घरी दुधाची पिशवी नेण्यासाठी आला होता. मात्र दूध घेऊन दुकान बंद करत असताना नगरपंचायतीचे पथक तिथे पोहचले. दुकान उघडल्याने त्याच्याकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
संगमेश्वरात शुक्रवारपासून भाजी विक्रीही बंद
संगमेश्वर तालुक्यात माखजन, संगमेश्वर, देवरुखसह सर्वच बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेतील भाजी दोन दिवस सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.नागरिकांनी गर्दी करु नये म्हणून शुक्रवार पासून भाजी विक्रेत्यांनी भाजी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंडणगडात दोन दिवसात 56 हजारांचा दंड वसूल
मंडणगडातही लॉकडाऊनला 100 टक्के प्रतिसाद मिळाला. लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आवश्यक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी उसळली होती. या कालावधीत सोशल डिस्टंन्सिगचा बोजवारा उडाला. मास्क न वापरणाऱया 113 नागरिकांकडून 2 दिवसांत 56 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती नगर परिषद मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली.
लांजात शुकशुकाट
लांजा शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भयाण शांतता होती. शहरात कोर्ले तिठा, साटवली रोड, बाजारपेठेमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महामार्गावरुन ये-जा करणाऱया प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात होती.
राजापुरातही शांतता
राजापूर, पाचलसह अन्य बाजारपेठांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. नागरिकांनीही घरातच थांबणे पसंत केल्याने सर्वत्र शांतता होती. राजापूर तालुका सेफझोनमध्ये असल्याने तालुक्याला लॉकडाऊनमध्ये सुट देण्याची मागणी तालुकावासीयांनी केली होती. मात्र प्रशासनाकडून ती नाकारण्यात आली. तरीही लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी राजापुरात काटेकोरपणे बंद पाळण्यात आला. नाटे परिसरात दुचाकीवरून विनाकारण फिरणाऱयांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.