रुग्णसंख्या पाचशेनजीक, 50 जणांचा मृत्यू
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ात ब्लॅक फंगसचा फैलाव सुरूच आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेपासून सुरू झालेला ब्लॅक फंगसचा संसर्ग अद्याप कमी झालेला नाही. जिल्हय़ातील एकूण रुग्णसंख्या पाचशेनजीक पोहोचली असून आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसचा धोका अजून कमी झालेला नाही, हे दिसून येते.
कोरोनाच्या दुसऱया लाटेपासून जिल्हय़ात ब्लॅक फंगसचे रुग्ण सुरू झाले. अनेकांना आपले डोळे गमवावे लागले तर शस्त्रक्रिया करून अनेकांचे डोळे वाचविण्यात डॉक्टरांना यशही आले. गेल्या पाच महिन्यात ब्लॅक फंगसमुळे जिल्हय़ात 50 जण दगावले असून यामध्ये वृद्धांची संख्याच अधिक आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी दिली.
यासंबंधी ‘तरुण भारत’ने जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हय़ात ब्लॅक फंगसचे 484 रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी 305 जण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. ब्लॅक फंगसच्या सर्वाधिक रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत.
301 बाधितांवर एका बिम्समध्ये उपचार करण्यात आले. 61 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून 175 जणांवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले. खासकरून वयस्कांमध्ये ही बाधा दिसून येत आहे. आजवर मृत्युमुखी पडलेल्या 50 जणांपैकी वयस्कांची संख्याच अधिक असल्याचे डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी सांगितले.
शनिवारी सुवर्ण विधानसौधमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हय़ातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ब्लॅक फंगसबाधितांना इस्पितळातून डिस्चार्ज झाल्यानंतरही औषधे घरपोच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. कारण ब्लॅक फंगसवरील उपचार सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे सरकारने ही जबाबदारी स्वीकारली आहे.