अध्याय तेरावा
माणसाला समोर दिसणाऱया संसाराची खूप आवड असते. त्यातील प्रत्येक गोष्ट त्याला खरी वाटते. त्यामुळे त्या गोष्टीतून मिळणाऱया सुखदुःखात तो गुंतून पडतो. हा सगळा त्रिगुणांचा चमत्कार मायेच्या करामतीमुळे घडत असतो आणि भगवंत तर या त्रिगुणांच्या पलीकडे असतात. त्यामुळे त्यांच्यावर मायेचा काहीही प्रभाव पडत नाही. भगवंतांची अशी इच्छा असते की, त्यांच्या भक्ताने दिसणारा संसार हा सर्व मायेचा खेळ आहे हे ओळखावे आणि त्यातून बाहेर पडावे पण मनुष्य तर काही केल्या त्यातून बाहेर पडायला तयार होत नाही. भगवंत तर मागे लागलेत की, सद्गुरूंच्या कृपेनं मिळालेल्या ज्ञानरुपी शस्त्राने संसार छेदून टाकावा. मग हे घडावं कसं ? त्यासाठी भगवंत सांगतात की, हे लक्षात घ्या की, संसार म्हणून जितका आहे, ती सर्व भ्रांति आहे. हे जग, हा मनाचाच खेळ आहे, भास आहे, हे दिसणारे असल्यामुळे नाशवंत आहे या दृष्टीने याच्याकडे पाहा. असे सांगण्याचे कारण म्हणजे हा सर्व ईश्वराच्या मायेचा खेळ असल्यामुळे स्वप्नाप्रमाणे खोटा आहे. प्रत्यक्षात सर्वव्यापी परब्रह्मच अस्तित्वात आहे. पण हे लक्षात न घेता भ्रमिष्ट लोक संसार असे म्हणतात. उदबत्ती गोल फिरविली म्हणजे अग्नीचे कडे झाल्यासारखे दिसते, त्यातील अग्नी हा सत्य असतो आणि त्याचे कडे हे मिथ्या असते. त्याप्रमाणे संसाराविषयी विचार केला तर, ब्रह्म हे सत्य आणि संसार हा मिथ्या आहे. त्या संसारातील आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक इत्यादि सर्व विस्तवाच्या कोलतीप्रमाणे होत, असे समज. ते तीन गुणांनी झालेले मायेचेच परिणाम होत.
कोलिताच्या परिभ्रमणाच्या भासामुळे आणि त्याच्या फिरण्याच्या वेगामुळे ते कोलीत चक्रासारखे दिसते. ते क्षणभर दिसते व दुसऱया क्षणी नाहीसे होते. त्याचप्रमाणे हा संसार नाशवंत आहे.
जोपर्यत परिभ्रमण वेगाने चालू असते, तोपर्यंतच कोलिताचे कडे दिसते. ते परिभ्रमण नाहीसे झाले की, त्या कडय़ाचे स्वरूपही नाहीसे होते. त्याप्रमाणे जोपर्यंत भ्रम असतो, तोपर्यंत संसार हा खरा भासतो. भ्रम नाहीसा झाला की, संसार पहायचा म्हंटले तरी दिसत नाही.
माझा देह, माझी बायका मुले हाच मुख्य भ्रम होय. तो भ्रम नाहीसा होणे महत्त्वाचे आहे पण गम्मत अशी की, तो नाहीसा केल्याशिवायच काही लोक मुक्त असल्याचा अहंकार मिरवितात ! असो, हा संसार मायामय आहे हे समजून घेऊन त्यावरील आसक्ती सोडून शांती कशी स्वीकारायची तेही सांगतो. साधकाने हे जग नजरेआड करून सर्व इच्छा सोडून काहीही न करता स्वस्थ राहावे आणि आत्मानंदात मग्न असावे. व्यवहारासाठी कधी काही दिसले तरी हे खरे नाही, असा निश्चय करून ते सोडून दिलेले असल्यामुळे भ्रम निर्माण होणार नाही. शरीर असेपर्यंत फक्त स्मरणरूप संसार राहील. पूर्वीच्या भजनाच्या अभ्यासाने सहजच दृष्टीही पवित्र होते आणि संसारात्मक त्रिपुटीही मिथ्या आहे असा दृढनिश्चय अंतःकरणांत होतो. संसारात्मक त्रिपुटी सोडून दृष्टी शांत केली की, दागिन्यांच्या नक्षीकडे लक्ष जाण्याआधी त्यातील सोने लक्ष वेधून घेते त्याप्रमाणे हृदयातील मी प्रामुख्याने लक्षात येतो.
असे झाले की, समोर दिसणारे दृश्य, पाहणारे आपण आणि समोरच्या दिसणाऱया गोष्टीचा आपल्या मनावर होणारा परिणाम या त्रिपुटीकडे दुर्लक्ष करायचे आहे हे ध्यानात ठेवून आहे त्यात समाधानी रहावे हे साध्य होण्याकरिता सर्व आशा सोडावी, वाणीने मौन धारण करावे आणि देहाचे व्यापार आवरून धरावेत. वेदशास्त्रांचा पसारा सोडून द्यावा, तोंडाच्या वादाची रिकामी बडबड सोडून द्यावी आणि जेणेकरून आशेचे मूळ समूळ उच्छेदन होईल अशी भगवंताची दृढ भावना ठेवावी. काया, वाचा आणि मन यांना आपण नीटपणे आवरून धरावे. आत्मस्वरूपाचे लक्ष सुटू देऊ नये. निरंतर आत्मस्वरूपातच दक्ष असावे. त्या स्वरूपाच्या सुखात गुंतले असता देहाचे देहपणही आठवत नाही. अहंकारासह मनच लुप्त होऊन जाते. आणि परिपूर्ण स्वानंद भरून वाहू लागतो. तेथे देव आणि भक्त हा भेदभावही शिल्लक राहात नाही.
क्रमशः