(अध्याय चौथा)
जयंती नंदन पिप्पलादी मुनी पुढे म्हणाले, ‘आपल्याला छळणाऱयाचा स्वीकार करणे हे पूर्ण अवस्थेचे लक्षण नारायणाने कामादीकाना दाखवून दिले. भगवतभजन करणाऱयांच्या मार्गात विघ्ने आणणे हे इंद्राचे काम! पण भक्ती जर सच्ची असेल तर इंद्रालाही हात चोळत बसावे लागते. कारण नुसत्या नेत्र कटाक्षाने भगवंत सर्वांचे नियमन करत असतात. हरिनामानेच भक्तांचे संरक्षण होत असते. भक्तांचा कैवार घेऊन देव अनेक अवतार घेतात. भगवंत गीतेच्या चौथ्या अध्यायात ते अवतार कधी घेतात आणि काय कार्य करतात याबाबत सांगतात,
गळूनि जातसे धर्म, ज्या ज्या वेळेस अर्जुना ।
अधर्म उठतो भारी तेंव्हा, मी जन्म घेतसे ।। 4.7 ।। राखावया जगी संता, दुष्टा दूर करावया ।
स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगी युगी ।। 4.8।।
धर्मरक्षण आणि सज्जनांना त्रास देणाऱया दुष्टांचे निर्दालन ही दोन प्रमुख कार्ये करण्यासाठी ईश्वरी अवतार होत असतात. ईश्वर जेव्हा अवतार घेतात तेव्हा त्यांचा उल्लेख भगवान किंवा भगवंत असा करतात जसे भगवान राम, भगवान कृष्ण इत्यादि..असे अनेक अवतार घेऊन भगवंतांनी भक्तांचा कैवार कसा घेतला त्याची अतिअद्भुत माहिती आपण थोडक्मयात घेऊयात. प्रमुख दहा अवतार असून इतर अवतार लक्षात घेता एकूण चोवीस अवतार आहेत प्रमुख दहा असे,
मत्स्यः कूर्मो वराहश्च नरसिंहश्च वामनः रामो रामश्च रामश्च कृष्णः कल्कि च ते दश। मासा, कासव, वराह, मानवी सिंह, वामन परशुराम, दशराथी राम, बलराम,आणि कल्की.
35 अवताराची तपशीलवार माहिती अशी, सनकादिक ब्रह्मकुमारांनी पिताजींना प्रश्न केला व त्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या निमित्ताने हरीने हंसावतार घेऊन ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. ज्याचे नाव ऐकताच काळही पळून जातो, ज्याच्या नामस्मरणाने जन्ममरण नाहीसे होते, तो श्रीदत्तात्रयाचा अवतार म्हणजे मूर्तिमंत परब्रह्म होय. नै÷िक ब्रह्मचारी सनकादिकही अवतार मूर्तीच होत. नारायणाला जाणणारे आमचे पिताजी ऋषभ मुनी हेही भगवंताचे अवतारच आहेत. भगवान श्रीकृष्णांनी हायग्रीव अवतार घेऊन मधूकैटक राक्षसाचा नाश केला आणि मधुसूदन नावाने प्रसिद्ध झाले. पुढे शंखासुराला मारून त्यांनी वेदांचे रक्षण केले. मत्स्यावतारात प्रलयकाळाच्या जळात पृथ्वीचे मनु व वनस्पतीसह रक्षण केले. कुर्मावतारात त्याने आपल्या पाठीवर मंदार पर्वत धारण केला क्षीरसागराचे मंथन करून देवांना अमृत अर्पण केले. वराह अवतारात हिरण्याक्ष दैत्याला मारून पृथ्वीचा उद्धार केला व परमशांती दिली. दीनांचे संकट निवारण्यासाठी वैकुंठाहून येऊन गजेंद्राचा मगरीने गिळलेला पाय सोडवून अतिशय प्रेमाने उद्धार केला. मार्कंडेय ऋषी बुडत असताना स्मरण केल्या केल्या भगवंताने तत्काळ त्यांना तारले. ही यादी बरीच मोठी आहे, तिचा उर्वरित भाग आपण पुढील अंकात पाहू …
क्रमशः