भगवदगीता म्हणजे आपल्या सर्वांना मनुष्य जीवनाचे सार्थक कशामध्ये आहे व ते कसे प्राप्त करावे याची विस्तृत माहिती देणारा ग्रंथ. ज्याप्रमाणे आपण एखादी वस्तू बाजारातून विकत आणतो तेव्हा त्याचा कसा वापर करावा याबद्दल माहिती देणारी एक पुस्तिका आपल्याला दिली जाते. त्याचप्रमाणे आपल्याला मिळालेल्या मनुष्य देहाचा वापर कसा करावा याची माहिती ज्यांनी आपल्याला देह दिला आहे आणि ज्याचे आपण सनातन अंश आहोत त्या भगवान श्रीकृष्णाने आपल्याला गीता हा ग्रंथ दिला आहे. या पवित्र ग्रंथामध्ये 5 महत्त्वपूर्ण तत्त्वांचे वर्णन केले आहे. त्याचे थोडक्मयात वर्णन खालीलप्रमाणे.
परमेश्वर: परमेश्वर याचा अर्थ जो सर्वाना नियंत्रित करतो पण त्याला कोणीही नियंत्रित करू शकत नाही अशी व्यक्ती. त्याला भगवान, परमात्मा, परब्रह्म या प्रमाणेही संबोधित केले जाते. त्याचे कृष्ण, राम, अल्लाह, जेहोवा, बुद्ध, गॉड या नावानेही शास्त्रामध्ये वर्णन केले जाते. श्रीकृष्ण सांगतात की, ही भौतिक प्रकृती माझ्या नियंत्रणाखाली कार्य करीत आहे. ब्रह्मांडामध्ये आश्चर्यकारक घटना घडत असताना आपण दररोज पाहतो, या सृष्टीमागे एक नियंत्रक आहे हे आपण जाणले पाहिजे. कोणतीही घटना नियंत्रणाशिवाय प्रकट होऊ शकत नाही. आपणही सर्वजण या प्रकृतीच्या नियंत्रणाखाली जगत आहोत हे कोणीही नाकारू शकत नाही. पण आपणाला कोण नियंत्रण करतो याची कल्पना नाही. गीतेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे श्रीकृष्ण सर्व सृष्टीचे नियंत्रण करतात आणि आपण सर्वजण या सृष्टीचा एक क्षुल्लक अंश आहोत.
आत्मा : श्रीकृष्ण सांगतात की सर्व जीव हे त्यांचे सनातन अंश आहेत, पण मन आणि इंद्रियांच्या आधीन होऊन या भौतिक जगामध्ये दु:ख भोगत आहेत. आपण आपली स्वतःचीच ओळख विसरलो आहोत म्हणून आपल्याला आपण कोण आहोत याची गीता आठवण करून देते. आपण शरीर नसून आत्मा आहोत. हा आत्मा जन्मही घेत नाही आणि त्याचा मृत्युही होत नाही. शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही. या आत्म्याचे शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱयाने त्याला सुकविता येत नाही. हा आत्मा अविनाशी व न तुटणारा आहे. हा आत्मा सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि नित्य आहे. काही लोक आत्म्यालाच परमात्मा समजतात पण गीतेनुसार आपण अंश आहोत आणि परमात्म्याच्या नियंत्रणाखाली आहोत.
प्रकृती : श्रीकृष्ण सांगतात की पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या माझ्या आठ भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. शत्त्व, रज, तम अशा अदृश्य तीन गुणाद्वारे ही प्रकृती आपल्याकडून कर्म करून घेते पण अज्ञानी लोकांना वाटते की मीच कर्ता आहे. याला मिथ्या अहंकार म्हणतात. या मिथ्या अहंकारामुळेच आपल्याला 84 लक्ष शरीरामध्ये जन्म घ्यावा लागतो. या प्रकृतीची तुलना एखाद्या कारागृहाशी करता येईल. ज्याप्रमाणे कारागृहामध्ये कैद्यांना शिक्षा दिली जाते त्याचप्रमाणे या प्रकृतीच्या अधीन असलेल्या जिवांना जन्म, मृत्यू, जरा, व्याधी याची शिक्षा होते.
कर्म : जीव जेव्हा आपले स्वतःचे अस्तित्व म्हणजे मी आत्मा आहे हे विसरून जेव्हा कर्म करतो तेव्हा त्याचा परिणाम म्हणून आपल्याला अनेक सुख दु:खाचा सामना करावा लागतो. आपण कोणतेही कर्म केल्यास त्याचा चांगला अथवा वाईट परिणाम हा होणारच, हा गीतेमधील कर्माचा सिद्धांत आहे. गीता फक्त कर्म करा हे शिकवत नाही तर कोणत्या भावनेमध्ये कर्म करावे हे शिकवते. श्रीकृष्ण सांगतात की कर्माची गुंतागुंत समजणे हे अतिशय कठीण आहे
काळ : यामध्ये अखिल ब्रह्मांड आणि सृष्टीची कालमर्यादा याचे वर्णन येते. जीव आणि प्रकृती याचे काळाच्या प्रभावाने कसे नियंत्रण केले जाते याचेही वर्णन गीतेमध्ये केले आहे. त्याचप्रमाणे काळ कसा सर्व गोष्टींचा शेवट करतो याचीही माहिती दिलेली आहे.
या पाच तत्त्वांचा ताळमेळ या भौतिक सृष्टीमध्ये कसा बसतो याचे सुंदर वर्णन तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये खालीलप्रमाणे केले आहे.
पंचभूतांचा गोंधळ । केला एके ठायी मेळ । लाविला सबळ, अहंकार त्या पाठी ।।1।। तेथे काय मी ते माझे । कोण वागवी ते ओझे । देहा केवी रिझे । हे काळाचे भातुकें ।। 2।। जीव न देखे मरण । धरी नवी सांडी जीर्ण । संचित प्रमाण । भोग शुभा अशुभासी ।।3।। इच्छा वाढविते वेल । खुंटावा तो खरा बोल । तुका म्हणे मोल । झाकले ते पावेल ।।4।। अर्थात पाच महाभूतांचा एका ठिकाणी मिळून आपला देह तयार झाला व श्रीकृष्णाच्या मायेने तो देह म्हणजे मीच आहे असा अहंकार आपल्यामध्ये निर्माण झाला. देहाचा जीवात्माशी काहीही संबंध नाही तरी आपण देहाला मी असे का म्हणतो? देह म्हणजे काळाचे खाद्य आहे तरी आपण मोह का धरतो? वास्तविक आत्मा हा अमर आहे. जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र धारण करावे तसा जीर्ण देह टाकून आत्मा कर्माचे भोग घेण्यासाठी दुसरा देह धारण करतो. अनेक जन्माचा मूळ असणारे जे कर्म त्याची वाढ भौतिक इच्छेमुळे होते म्हणून अशा भौतिक इच्छांना थांबवण्यासाठी मनुष्य जन्म आहे म्हणून जे आपली इच्छा नष्ट करतात त्यांना सत्य समजते व वास्तविक आनंद प्राप्त होतो, जो सद्यस्थितीत झाकून गेला आहे.
सारांशाने सांगावयाचे झाल्यास आपण सर्व जीव भगवान श्रीकृष्णाचे सनातन अंश आहोत. श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत आणि आपण त्यांचे नित्य सेवक आहोत. पण सद्यस्थितीत आपण हा आपला स्वभाव विसरून या जगात निरनिराळय़ा इच्छांची पूर्ती करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. परिणामी प्रकृतीच्या आधीन असल्याकारणाने आपल्याला दु:खच प्राप्त होत जाते. हे कार्य सृष्टीच्या सुरुवातीपासून नित्य चालू आहे. त्यामुळे आपल्याला 84 लक्ष शरीरामध्ये जन्म घेत शेवटी मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे. या मनुष्यजन्मात आपण श्रीकृष्ण कोण आहेत, कुठे असतात, आपल्यावर प्रेम कसे करतात, ते आपल्याला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या दु:खातून कायमचे कसे मुक्त करू शकतात याचे विस्ताराने वर्णन भगवद्गीतेमध्ये केले आहे. शेवटी अर्जुनाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सर्व ज्ञानामधील गुह्यतर असे परमश्रे÷ ज्ञान आपल्या हितासाठी पुढीलप्रमाणे सांगत आहेत. ‘सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस.’ ही आज्ञा ऐकल्यावर आपल्याला असे वाटेल की श्रीकृष्णाला किती अहंकार झाला आहे, मला शरण या म्हणतात, माझी भक्ती करा असे म्हणतात पण हा त्यांचा अहंकार नसून प्रेमळपणा आहे. ज्याप्रमाणे आपले वडील आपल्याला माझ्या आज्ञेचे पालन कर म्हणतात तेव्हा आपले हित त्यामध्ये असते. त्याप्रमाणे आपल्याला अहंकार असल्याने तो अहंकार आपल्याला श्रीकृष्णामध्ये दिसतो. नाहीतर संत तुकाराम, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, शंकराचार्य यांनी श्रीकृष्णाची भक्ती करा अशी शिकवण दिली नसती. या संतांनी फक्त उपदेशच केला नाही तर श्रीकृष्णाची भक्ती कशी करावी हे स्वतःच्या जीवनावरून प्रत्यक्षात दाखवून दिले. म्हणून तर तुकाराम महाराज सांगतात, गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवताचे दररोज वाचन करा आणि नित्य भगवंताचे नामस्मरण म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. हाच गीतेचा संदेश आहे. याचे स्मरण गीता जयंतीच्या निमित्ताने करावे.
वृंदावनदास , (भाग दोन)