या आठवडय़ात मोक्षदा एकादशी आहे या दिवसाला गीता जयंतीही म्हणतात. या दिवशी जवळ जवळ 5000 वर्षांपूर्वी कुरुक्षेत्र येथे भगवान श्रीकृष्णांनी आपला भक्त व सखा अर्जुनाला भगवद्गीतेचे ज्ञान दिले. आजही ही जागा हरियाणा राज्यामध्ये कुरुक्षेत्र या नावाने प्रसिद्ध आहे. येथील ज्योतीसर या ठिकाणी आजही एक वटवृक्ष उभा आहे जो याची साक्ष देतो. दरवषी लाखो लोक या धार्मिक क्षेत्राला भेट देतात. काही जणांना महाभारतकाळ दंतकथा वाटतो परंतु महाभारतातील अनेक घटनांची साक्ष देणारी अनेक स्थाने आजही आपल्याला बघावयास मिळतात. त्यापैकी जिथे भगवद्गीता सांगितली गेली ते प्रसिद्ध स्थान ज्योतीसर हे एक आहे. पण काही जणांना हाही प्रश्न पडतो की जर 5000 वर्षांपूर्वी भगवद्गीतेचे ज्ञान देऊन धर्माची स्थापना भगवंतांनी केली असेल तर त्या अगोदरच्या काळात काय अधर्माचे राज्य होते का? त्या काळापूर्वीचे लोक काय अज्ञानी होते का? या प्रश्नाचे उत्तर स्वतः भगवंतच आपल्याला भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये देतात. (भगी4.1) इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे।़ब्रवीत् अर्थात भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ‘मी या अव्ययी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानवजातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकूला केला.’ याच संदर्भात महाभारतमध्येही (शांतिपर्व 348.51-52) भगवद्गीतेचा इतिहास पुढीलप्रमाणे आढळतो. त्रेतायुगादौ च ततो विवस्वान मनवे ददौ । मनूश्च लोकपृत्यर्थ सुतायेक्षवाकावे ददौ।। इक्ष्वाकूणा च कथितो व्याप्य लोकनवस्थितः।। अर्थात ‘त्रेतायुगाच्या प्रारंभी भगवंताशी असणाऱया संबंधाविषयाचे हे विज्ञान विवस्वानने मनूला सांगितले. मानवजातीचा जनक मनू याने हे विज्ञान आपला पुत्र व पृथ्वीचा अधिपती महाराज इक्ष्वाकूला प्रदान केले आणि महाराज इक्ष्वाकू हे प्रभू श्रीरामचंद्र अवतीर्ण झालेल्या रघुवंशाचा पूर्वज होते’. या इतिहासाप्रमाणे इक्ष्वाकूच्या काळापासून भगवद्गीता मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे.
4,32,000 वर्षे चालणाऱया वर्तमान कलियुगातील जवळ जवळ 5000 हून थोडी अधिक वर्षे संपली आहेत. यापूर्वी द्वापार युग (8,00,000 वर्षे) होते आणि द्वापार युगांपूर्वी त्रेतायुग(12,00,000 वर्षे) होते. याप्रमाणे सुमारे 20,05,000 वर्षांपूर्वी मनूने भगवद्गीता आपला पुत्र आणि शिष्य, पृथ्वीलोकाचा अधिपती महाराज इक्ष्वाकूला सांगितली. वर्तमान मनूचे आयुष्य सुमारे 3,05,30,000 इतकी वर्षे आहे आणि त्यापैकी 12,04,00,000 वर्षे निघून गेली आहेत. भगवंतांनी आपला शिष्य सूर्यदेव विवस्वान याला मनूच्या जन्मापूर्वी गीता सांगितली हे मान्य केल्यास सर्वसाधारपणे निदान 12,04,00,000 वर्षांपासून हे सनातन ज्ञान अस्तित्वात आहे. पाच हजार वर्षांपूर्वी भगवंतांनी तेच ज्ञान कुरुक्षेत्रमधील रणांगणावर भ्रमित झालेल्या अर्जुनाला पुन्हा गीतेच्या स्वरूपात सांगितले. भगवान अर्जुनाला सांगतात एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः । स कालेनेह महता योगे नष्टः परन्तप । अर्थात ‘याप्रमाणे हे परमश्रे÷ विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी हे त्याच पद्धतीने जाणून घेतले, पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते.’ पाच सहस्त्र वर्षांपूर्वी गुरुशिष्य परंपरा खंडित झाल्याने गीतेचा मूळ उद्देश लुप्त झाला म्हणून भगवंतांना अर्जुनाला माध्यम करून पुन्हा तेच सनातन ज्ञान देण्यासाठी निवडले, कारण अर्जुन हा श्रीकृष्णाचा भक्त आणि सखा होता.(भ गी 4.3) स एवायं मया ते।़द्य योगः प्रोक्तः पुरातनः ।भक्तो।़सि मे सखा चेति रहस्यंह्येतदुत्तमम् । अर्थात ‘भगवंताशी असणाऱया संबंधाचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस.’ अर्जुन भक्त आहे म्हणूनच त्याला भगवद्गीतेचे रहस्यही सहजपणे उलगडले परंतु केवळ संस्कृतचे ज्ञान असून जर भगवान श्रीकृष्णांचा भक्त जर कोण नसेल तर त्याला भगवद्गीतेचे विज्ञान समजणे अशक्मय आहे. बहुतेक गीता भाष्यकार भगवान श्रीकृष्णाचे भक्त नाहीत आणि काही जणांना तर भगवान श्रीकृष्ण कोण आहेत याचे साधे ज्ञानसुद्धा नाही. अर्जुन हा श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम श्रीभगवान म्हणून स्वीकार करतो म्हणूनच त्याला भगवद्गीतेचे ज्ञान प्रत्यक्षात उतरवता आले. श्रीपाद शंकराचार्य भगवद्गीतेचे माहात्म्य वर्णन करताना म्हणतात, गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत्प्रयतः पुमान्। विष्णोः पद्मवाप्नोति भयशोकादिवर्जितः। अर्थात ‘जी व्यक्ती भगवद्गीतेतील उपदेशांचे पालन करते ती जीवनातील सर्व दुःखे आणि चिंता यामधून मुक्त होते. सर्व प्रकारच्या भयापासून अशी व्यक्ती मुक्त होऊ शकते व तिचा पुढील जन्म आध्यात्मिक असू शकतो. गीताध्यायनशीलस्य प्राणायामपरस्य च। नैव सन्तिहि पापानि पूर्वजन्मकृतानि च अर्थात ‘जर मनुष्याने भगवद्गीतेचे प्रामाणिकपणे व पूर्ण गांभीर्याने अध्ययन केले तर भगवंताच्या कृपेने त्याच्या पूर्वजन्मातील दुष्कर्माचा त्याच्यावर किंचितही परिणाम होत नाही.’ स्वतः श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या शेवटी 18 व्या अध्यायात सांगतात, सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा श®ाः अर्थात ‘सर्व विविध प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि फक्त मला शरण ये. मी तुझी सर्व पापकर्मातून मुक्तता करतो.’ याप्रमाणे जो भगवंतांना शरण जातो त्याची जबाबदारी स्वतः भगवंत घेतात आणि अशा व्यक्तीची सर्व पापकर्मातून मुक्तता करतात. मल-निर्मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने। सकृद्गीताम्भसि स्नानं संसारमलनाशनम्। अर्थात ‘प्रतिदिन मनुष्य पाण्याने स्नान करून स्वच्छ होत असेल परंतु जर एखाद्याने एकदासुद्धा पवित्र जलरूपी भगवद्गीतेमध्ये स्नान केले तर त्याची भौतिक जीवनाची मलिनता पूर्णपणे नष्ट होते.’ भगवद्गीता ही पुरुषोत्तम श्रीभगवान यांच्या मुखातून प्रकट होते तर गंगा त्यांच्या चरणकमलातून उत्पन्न होते. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः। पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। अर्थात ‘सर्व उपनिषदांचे सार असलेले गीतोपनिषद किंवा भगवद्गीता ही एका गाईप्रमाणे आहे आणि गोपाळ म्हणून विख्यात असलेले भगवान श्रीकृष्ण तिचे दूध काढत आहेत. अर्जुन हा वासराप्रमाणे आहे तर विद्वानजन आणि शुद्ध भक्त हे भगवद्गीतेचे अमृततुल्य दूध प्राशन करीत आहेत.’ एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतम् एको देवो देवकीपुत्र एव। एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा। अर्थात ‘वर्तमान काळात लोक एकच शास्त्र, एकच परमेश्वर, एकच धर्म आणि एकच सेवा (ध्येय) असण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. म्हणून विश्वाकरिता एकच भगवद्गीता हे शास्त्र असावे, अखिल विश्वाकरिता एकच देव देवकीपुत्र श्रीकृष्ण असावा, एकच मंत्र, एकच प्रार्थना असावी आणि ती म्हणजे त्यांच्या पवित्र नामाचा जप आणि सर्वासाठी एकच कर्म असावे व ते म्हणजे भगवंतांची भक्तिमय सेवा. मोक्षदा एकादशीच्या निमित्ताने याचे चिंतन जरूर करावे.
-वृंदावनदास