शारदोत्सव सोहळय़ात अनंत मनोहर यांच्या स्मृतीला आदरांजली
प्रतिनिधी /बेळगाव
शारदोत्सव सोहळय़ात शुक्रवारी अनंत मनोहर यांच्या स्मृतीला आदरांजलीपर व्याख्यान, रत्नाकर मतकरी यांच्या निर्मनुष्य कथेचे मेधा मराठे यांनी केलेले नाटय़ रुपांतर सादरीकरण, त्यांनीच अनंत मनोहर यांच्या ‘धन कथेचे’ केलेले अभिवाचन तसेच आरण्यक नाटकातील प्रवेश सादरीकरण असे कार्यक्रम झाले.
प्रारंभी मिरज माहेर मंडळातर्फे ईशस्तवन व स्वागतगीत झाले. त्यानंतर आरती जाधव यांनी अनंत मनोहर यांच्या साहित्याचा आढावा घेतला. त्यांचा परिचय रश्मी फडके यांनी करुन दिला. माधुरी शानभाग यांनी वक्त्यांचा सत्कार केला. सुत्रसंचालन शितल बडमंजी यांनी केले. शरयु वाघ यांनी आभार मानले.
निर्मनुष्य या भयकथेचे सादरीकरण मुक्त ग्रुपने केले. रत्नाकर मतकरी यांच्या या कथेचे संक्षिप्तीकरण व नाटय़रुपांतर मेधा मराठे यांनी केले. या भयकथेने प्रेक्षकांच्या मनातही भय निर्माण करुन उत्सुकता ताणली. निर्मनुष्य अशा रस्त्यावर पत्रकार फिरत असतो. तेथेच त्याला एक चित्रकार भेटतो. तो चित्रकार त्या रस्त्याचे वर्णन करत हा रस्ता सुरक्षित नाही, असे सतत सांगत राहतो. रस्त्यात कोणी दिसत नाही मग गाडय़ांचे माणसांचे आवाज येतात कसे? असा प्रश्न पत्रकाराला पडतो. त्याला चित्रकाराची सोबत हवीशी वाटते. त्यामुळे त्याचे भय कमी होते. तेवढय़ात एक मुलगी बचाव बचाव करत धावत येते. पत्रकाराला त्याचीही भिती वाटते.
तो त्या मुलीच्या मदतीसाठी चित्रकाराची मदत मागतो. दरम्यान एका व्यक्तीचा खूनही त्याच्या डोळय़ासमोर होतो. आता ऑफीसला जावे, असा विचार तो करतो. तेवढय़ात चित्रकार त्याला अरे काल दंगलीमध्ये तुझ्या हातावर काठी पडली आणि तुसुध्दा मृत झाला आहेस, असे सांगतो आणि पत्रकार हादरुन जातो. जगातील सर्व सत्य समजण्यास जन्म अपुरा पडतो आणि काही गोष्टी मेल्यावरच कळतात या वाक्मयाने या नाटय़ाचा शेवट होतो. या प्रसंगातील प्रत्येकाने आपले काम चोख बजावत गुढता कायम ठेवली. त्यामुळे भय कथा असूनही तीचे सादरीकरण प्रेक्षकांना आवडले.
यामध्ये प्रिया काळे (पत्रकार), दीपा देशपांडे ( चित्रकार), मधुमिता बापट (राऊळ), प्राजक्ता बेडेकर (तरुणी), सुप्रिया भिडे, रमा भिडे, रजिता दाणी (अतृप्त आत्मे) यांचा सहभाग होता. संगीत संयोजन श्रीधर कुलकर्णी यांचे होते.
डॉ. उर्मिला जोशी यांचे आज व्याख्यान
शारदोत्सव सोहळय़ात शनिवार दि. 9 रोजी डॉ. उर्मिला जयदीप जोशी यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी 3.30 वाजता कोनवाळ गल्ली, लोकमान्य रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. ‘जैविक उत्क्रांतीच्या वाटेवर’ या विषयावर त्या बोलणार आहेत. त्या के. एम. कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रिन्सिपॉल व प्राध्यापक आहेत. एम. फॉर्म व पीएचडीसाठी त्या मार्गदर्शन करतात. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध त्यांनी लिहिले आहेत. मध्यंतरानंतर प्रा. माधुरी शानभाग यांच्या कथेवर आधरित डॉ. संध्या देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित विज्ञानावर आधारित एकांकिका सादर करण्यात येईल.