नुकसानीचे अहवाल तात्काळ सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश : चिपी येथे घेतला आढावा
प्रतिनिधी / परुळे:
तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या फळबागा, झाडे, महावितरण, घरे अशा नुकसानग्रस्तांचे पंचनामे करा आणि तात्काळ अहवाल सादर करा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. वादळात झालेल्या नुकसानाबरोबरच त्यांनी भूमिगत विद्युत वाहिनी, धूपप्रतिबंधक बंधारे, चिपी विमानतळ याबाबतही संबंधित विभागाच्या अधिकाऱयांकडून आढावा घेतला.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या ठाकरे यांनी चिपी विमानतळ येथे आढावा बैठक घेतली. पालकमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आदी उपस्थित होते.
कुणीही भरपाईपासून वंचित राहणार नाही!
मुख्यमंत्री म्हणाले, वादळाची पूर्वसूचना मिळाल्याबरोबर यंत्रणा कार्यान्वित झाली होती. यावेळेला जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. अशाही परिस्थितीत कोविड रुग्णांचा ऑक्सिजनपुरवठा खंडित होऊ दिला नाही, त्याबद्दल धन्यवाद देतो. पंचनामे लवकर संपवून तात्काळ अहवाल पाठवावा. जेणेकरून कुणीही वंचित राहणार नाही. नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. भूमिगत विद्युत वाहिनी, धूपप्रतिबंधक बंधारे याबाबतही आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, जे प्रस्ताव केंद्राकडे आहेत, त्याबाबत निश्चित पाठपुरावा केला जाईल. राज्यस्तरावरील प्रस्तावांना मार्गी लावण्यात येईल. चिपी विमानतळाबाबतही आढावा घेऊन लवकर सुरू करण्याबाबत त्यांनी सूचना केली.
संभाव्य तिसऱया लाटेसाठी तयारी हवी!
संभाव्य तिसऱया लाटेसाठी तयारी हवी. मिशन ऑक्सिजन अंतर्गत जिल्हय़ाला स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प उभे करण्याबाबत प्रयत्न करावेत. आरोग्य यंत्रणेला आवश्यक सर्व गोष्टी पुरविल्या जातील, असेही ते म्हणाले.
बंदरांच्या ठिकाणी हवी आपत्कालीन यंत्रणा
पालकमंत्री सामंत म्हणाले, जिल्हय़ात मोठी बंदरे आहेत. अशा ठिकाणी आपत्कालीन कक्ष सुरू केल्यास यंत्रणा सज्ज राहील. सीआरझेडबाबत लवकर बैठक व्हावी, असेही ते म्हणाले. खासदार राऊत म्हणाले, भूमिगत विद्युत वाहिनी आणि संरक्षण करणारे 21 बंधारे या योजना महत्वाच्या आहेत. 21 बंधारे मंजूर आहेत. हे दोन्ही विषय मार्गी लावावेत. आमदार केसरकर म्हणाले, काळय़ा दगडांचे बंधारे घालणे, भूमिगत केबलचे काम पूर्ण करावे, मच्छीमारांच्या जाळय़ा वाहून जातात. त्याबाबत नोंदी व्हाव्यात. वाहून गेलेल्या मस्त्यबीजाची नुकसान भरपाई मिळावी. आमदार नाईक यांनीही मंजूर बंधाऱयांचे कामकाज पूर्ण होण्याबाबत सूचना मांडली.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संगणकीय सादरीकरण करून नुकसानीचा सविस्तर आढावा दिला. यामध्ये पूर्वतयारी, पूर्वसूचना, चक्रीवादळापूर्वीची यंत्रणेची सज्जता, नागरिकांचे स्थलांतर, मच्छीमार नौकांची माहिती, 16 ते 19 मे दरम्यान झालेले पर्जन्यमान, घरांचे नुकसान, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, शेतीचे नुकसान, मच्छीमारांचे नुकसान, महावितरण नुकसान आदींचा समावेश होता.
पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे आदींसह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.