- गुजरात सरकारच्या ‘माईंड टू मार्केट’ मेंटरिंग प्रकल्पाचे उदघाटन
ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
युवाशक्तीच्या नव संकल्पनांना प्रोत्साहन देऊन भारताची 5 हजार वर्षाची आयुर्वेद प्रणाली आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी गुजरात सरकारच्या 200 कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी अशा माईंड टू मार्केट (‘एम टू एम’) या प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच आयुष खात्याचे केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक, बी व्ही जी ग्रुप चे संस्थापक हणमंतराव गायकवाड, गुजरातचे शिक्षण मंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा, स्टार्ट अप अँड इनोव्हेशन हब (आय हब) चे चीफ मेंटॉर हिमांशू पांड्या, आय हब चे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरण्मय महंता यांच्या हस्ते झाले.
ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात ‘माईंड टू मार्केट’ प्रकल्पातील युवकांनी, संशोधकांनी सहभाग घेतला.
या प्रकल्पात युवकांना आणि विद्यार्थ्यांच्या आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पती च्या उपयोगाविषयीच्या नवसंकल्पनांना मार्गदर्शन आणि बळ दिले जाणार आहे.युवकांना संशोधन, प्रमाणीकरण, उत्पादन, विपणन अशा सर्व टप्प्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी गुजरात सरकारने बी व्ही जी लाईफ सायन्सेस लिमिटेडशी सहकार्य करार केला आहे.माईंड टू मार्केट (‘एम टू एम ‘) हा 200 कोटी चा मेंटरींग प्रकल्प आहे.आयुर्वेद आणि हर्बल लाईफ क्षेत्रातील स्टार्ट अप्सला या प्रकल्पातून बळ दिले जाणार आहे. ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेअंतर्गत उत्पादन केले जाणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, कोविड साथीच्या काळात ‘आयुष’ च्या उपायांनी भारतीयांना मदत झाली आयुर्वेदावरील विश्वास वाढीस लागला आहे,मागणी वाढली असून भविष्यातील आरोग्य व्यवस्थापनात आयुर्वेद आणि औषधी वनस्पतींच्या उपचाराला महत्वाचे स्थान असणार आहे. आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनात गुणवत्तायुक्त कच्चा माल लागणार असून रोपवाटिका, हर्बल गार्डन यांना उत्तेजन मिळणार आहे ग्रामीण अर्थकारणाला याचा चांगला उपयोग होणार आहे.
हणमंतराव गायकवाड म्हणाले, बी व्ही जी लाईफ सायन्सेस लिमिटेड आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पतींपासून सर्व प्रकारच्या विकारांवर गुणकारी औषधे निर्माण करीत आहे.आयुर्वेदिक औषधांवर संशोधन, प्रमाणीकरण, निर्मिती आणि विपणन यावर भर दिला जाणार आहे.भारत हा 5 हजार वर्षांपासून वनौषधींचा खजिना असून या वनौषधी, आयुर्वेद आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. गुजरातचे शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चुडासामा म्हणाले, आयुर्वेदाने अनेक जुनाट विकारांवर गुणकारी इलाज शोधले आहेत. तसेच या शास्त्राची व्याप्ती पाहता भारतातील प्रत्येक राज्यात आयुर्वेद विद्यापीठे उभी राहिली पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.