ऐन दिवाळीत आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दोन दिवसांची गोवा भेट बरीच गाजली. गोव्यातील विधानसभा निवडणुका उंबरठय़ावर येऊन ठेपल्याने, सर्वच पक्ष या भेटीमुळे सावध झाले आहेत. एवढे दिवस बिनधास्त असलेल्या सत्ताधारी भाजपची झोप या केजरीवाल भेटीने उडविली, हे मात्र निश्चित.
गोव्यात ‘आप’चे सरकार आल्यास दिल्ली मॉडेल गोव्यातही राबवू, अशी घोषणा करीत 300 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केजरीवाल यांनी आपल्या मागच्या भेटीत केली होती. त्याचा तत्काळ परिणाम म्हणून भाजप सरकारने 16 युनिट पाणी मोफत देण्याची योजना कार्यान्वित केली. ‘आप’च्या प्रत्येक आश्वासनावर भाजपकडून तत्काळ प्रतिक्रिया उमटत आहे. यावरून आपला त्यांनी किती गांभीर्याने घेतले आहे, हे दिसून येते.
गोव्यातील खाणी सुरू करण्याचा प्रश्न असो किंवा अनेक वर्षे प्रलंबित असलेला जमीन मालकी हक्कांचा प्रश्न, केजरीवाल यांनी या दोन दिवसांच्या भेटीत गोमंतकीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर तत्काळ प्रतिक्रिया म्हणून महामंडळांतर्गत खाणी सुरू करण्याचे जुनेच उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावे लागले. युवकांना आकर्षित करणाऱया ‘आप’च्या रोजगार हमी यात्रेला प्रत्युत्तर म्हणून भाजपने म्हापसा व फोंडय़ात स्वयंपूर्ण युवा रोजगार महामेळावे भरविले. गोमंतकीयांसाठी शिर्डी, काशी, वेलांकिणी व अजमेर यात्रेची घोषणा करताच भाजपने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘गोवा दर्शन’ योजनेची घोषणा केली. निवडणुकीच्या उंबरठय़ावर ऐन दिवाळीत सध्या भाजपाकडून मतदारांना आकर्षित करणाऱया आश्वासनांची खैरात तर ‘आप’कडून आतषबाजी सुरू आहे. गोमंतकीय मतदारांचे डोळे या आश्वासनांच्या आतषबाजीने कितपत दिपून जातील, हे येणाऱया निवडणुकीत स्पष्ट होईल.
आपने गोव्यातील विधानसभा निवडणूक बरीच गांभीर्याने घेतलेली दिसते. सुरुवातीला ख्रिस्ती मतदारांपुरता मर्यादित असलेला हा पक्ष आता गोमंतकीय बहुजन समाजापर्यंत आपला विस्तार करू पाहत आहे. ‘आप’नंतर गोव्यात दाखल झालेल्या तृणमूल काँग्रेसची बंगाली जादू गोमंतकीयांवर फारशी मोहिनी टाकू शकली नाही. खुद्द पक्षाच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हल्लीच दिलेल्या गोवा भेटीत त्या फारसा प्रभाव पाडू शकल्या नाहीत. गोव्यातील या फ्लॉप शोमुळे ज्या स्थानिक नेत्यांवर त्यांनी ही जबाबदारी सोपविली होती, त्यांच्यावर ममतादीदी बऱयाच संतापल्याचे वृत्त आहे. गोवा फॉरवर्ड या स्थानिक पक्षाने सुरुवातीला तृणमूलमध्ये विलीन होण्याची व नंतर युतीची आशा दाखवून माघार घेतल्याने ‘अजब है, ये गोवा के लोग’ असेच म्हणण्याची वेळ दीदींवर आली असेल. तृणमूलचा भ्रमनिरास झाला असला तरी काँग्रेसमध्ये मात्र पुन्हा एकदा उत्साह संचारलेला दिसतो. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गोवा भेटीने काँग्रेसला आपला हरवलेला सूर पुन्हा गवसलेला आहे. आता पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे काँग्रेसच्या गळाला लागले आहेत. शिवाय भाजपचे कळंगुटचे आमदार व मंत्री मायकल लोबो हेही काँग्रेसवासी होण्याची शक्यता असल्याने त्यांना हे अच्छे दिन म्हणावे लागतील. या एकंदरीत नवीन राजकीय घडामोडीमुळे भाजपला आता विविध मतदारसंघांमध्ये संभाव्य धोके स्पष्टपणे दिसू लागले आहेत. त्यामुळे आपला पूर्वीचा सोबती मगो पक्षाशी भाजप पुन्हा जवळीक साधू पाहत आहे. एवढे दिवस भाजपशी युती म्हणजे आत्महत्या म्हणणाऱया मगो नेते सुदिन ढवळीकरांनी बारा जागांची सशर्त अट ठेवली आहे मात्र मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हे कोणत्याही परिस्थितीत भाजपशी युती होणार नाही, यावर ठाम आहेत. केंद्रीय वाहतूक मंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यासह देवेंद्र फडवणीस हे मगोची मनधरणी करण्यास कितपत यशस्वी होतील, हे पाहावे लागेल. मगो भाजपसोबत जाऊन पुन्हा आत्महत्या करणार की, अन्य कुठल्या पक्षासोबत जाणार यावर एकंदरीत राजकीय समिकरणे अवलंबून आहेत.
कुठलाही प्रश्न वेळीच न सोडविता तो भिजत ठेवल्याने त्यातून समस्या अधिक गंभीर होतात. भाजपकडे गोव्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी पाच वर्षांचा कार्यकाळ होता. बंद असलेल्या खाण व्यवसायावर तोडगा काढणे, जमीन मालकी हक्काचा प्रश्न तडीस लावणे यापैकी कुठलाही प्रश्न वेळीच हाताळला न गेल्याने सरकार आज त्यात अडकून पडले आहे. राज्यातील कंत्राटी शिक्षक व अन्य कामगारांचा प्रश्न, नवीन नोकरभरती या सर्व समस्यांची भुते भाजपच्या मानगुटीवर बसलेली आहेत. त्यात भर म्हणून कौटुंबीक उमेदवारीच्या मुद्यावरून सरकारमधील काही महत्त्वाकांक्षी मंत्र्यांनी पक्षांतर्गत मोठा पेच निर्माण केला आहे. सरकारला बहुमताची बळकटी देण्यासाठी काँग्रेससह अन्य पक्षातील दहा आमदारांना फोडून जी सत्ता मिळविली, त्या विषवल्लीची जहरी फळे किती जाचक आहेत, याची अनुभूती आता येऊ लागली आहे.
‘आप’ने एक मोठी खेळी खेळत गोव्यात लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वाधिक मोठय़ा असलेल्या भंडारी समाजाकडे लक्ष केंद्रित केले आहे. भंडारी समाजातील काही प्रभावी नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपला शह देण्याची त्यांची ही रणनीती दिसते. केजरीवाल यांची भंडारी समाजाच्या मुख्य कार्यालयाला दिलेली भेट तसेच इतर समाजातील नेत्यांसोबत केलेले भोजन काय सांगते? गोव्यातील शिक्षण व आरोग्य क्षेत्रात दिल्ली मॉडेलनुसार सुधारणा घडवून आणण्याची केजरीवाल यांची घोषणाही गोमंतकीयांना आकर्षित करू शकते. थोडक्यात गोमंतकीय मतदारांना ज्या ज्या गोष्टी आकर्षित करू शकतील, त्या सर्व गोष्टींचा खोलात अभ्यास करून ‘आप’ने येणाऱया निवडणुकीची रणनीती आखलेली आहे. केजरीवाल यांच्या वरचेवर होणाऱया गोवा भेटीमुळे भाजपची अस्वस्थता वाढली आहे. तूर्त या दोन्ही पक्षांच्या आश्वासनांच्या आतषबाजीमुळे गोमंतकीय मतदार कितपत प्रभावीत होतील, हा कळीचा मुद्दा आहे.
सदानंद सतरकर