वाळपईत राजकीय स्थिती वेगळ्या वळणावर; भाजप कार्यकर्त्यांत अस्वस्थता
प्रतिनिधी /वाळपई
वाळपई मतदारसंघातील भाजपचे नेते सत्यविजय नाईक आम आदमी पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. या मतदारसंघातून दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवून सत्यविजय नाईक यांनी काँग्रेससमोर आव्हान निर्माण केले होते. आज बुधवारी सत्यविजय नाईक आपमध्ये प्रवेश करून झाडू हातात घेण्याची शक्यता आहे.
यामुळे वाळपई मतदारसंघातील राजकारण वेगळय़ाच वळणावर येण्याची शक्मयता आहे. वाळपई मतदारसंघांमध्ये एकूण पाच ग्रामपंचायती व एका नगरपालिकेचा समावेश आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षाकडे असलेल्या सर्व पंचायतींवर एकाच रात्रीत भाजपाचा झेंडा लागला. तर त्यानंतर वाळपई पालिका निवडणुकीतही सर्व भाजपाचेच नगरसेवक निवडून आले. यामुळे बहुतांश वाळपई मतदारसंघांमध्ये भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. विश्वजित राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या राजकीय भवितव्याबाबत सत्यविजय नाईक यांनी गेल्या चार वर्षांपासून अस्वस्थ होते. याबाबत त्यांनी अनेकवेळा बोलूनही दाखवले होते. विधानसभेची निवडणूक फक्त चार महिन्यांवर येऊन थांबलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपाचे जुने कार्यकर्ते यांच्याशी त्यांचे काही प्रमाणात चांगले संबंध होते. सत्यविजय नाईक यांच्याशी गेल्या दोन महिन्यांपासून आम आदमी पक्षाची यंत्रणा सातत्याने संपर्कात होती. सोमवारी अचानक सत्यविजय नाईक व त्यांचे काही समर्थकांनी दिल्ली गाठली. वाळपई मतदारसंघांत राजकीय स्तरावर खळबळ निर्माण झालेली आहे.
दरम्यान, सत्यविजय नाईके बुधवारी सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते सत्यविजय नाईक आपची झाडू हातात घेणार असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात सत्यविजय नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता भ्रमणध्वनी बंद लागत होता. त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे वाळपईतील भाजपाच्या कर्त्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झालेली आहे.