राहूल गांधी यांचा भाजपवर पलटवार : काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा विश्वास.रोजगार निर्मिती, खाणी सुरू करण्याचे आश्वासन
प्रतिनिधी /मडगाव
2017 च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील जनतेने भाजपला कौल दिला नव्हता. त्यांचे फक्त 13 आमदार निवडून आले होते. जनतेचा कौल हा काँग्रेसला होता व काँग्रेसचे 17 आमदार निवडून आले होते. भाजपच्या विरोधात कौल असताना देखील भाजपने पैशांच्या बळावर सरकार स्थापन करून जनतेचा कौल चोरला असा आरोप राहूल गांधी यांनी मडगावात पत्रकारांशी बोलताना केला.
राहूल गांधी काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी काल शुक्रवारी गोव्यात दाखल झाले आहेत. त्यापूर्वी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषद गोव्याशी निगडीत विविध विषयांवर भाष्य केले. त्यात रोजगार निर्मिती, खाणकाम पुन्हा सुरू करणे आणि गोव्याला आयटी आणि नॉलेज हब बनवणे यावर प्रामुख्याने भर दिला.
भाजप केवळ पैशांच्या बळावर सरकारे घडवित आहे. त्यांना जनतेचा कौल मिळत नाही. गोवा हे त्यांचे सर्वोत्तम उदाहरण आहे असे राहूल गांधी म्हणाले. आत्ता 2022 मध्ये गोव्यातील जनता पुन्हा काँग्रेसला स्पष्ट बहुमताचे सरकार देईल. यावेळी निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केला जाईल. मागच्या वेळी जी चुक पक्षाने केली, त्याची पुनरावृत्ती होऊ दिली जाणार नसल्याचे त्यांनी एका प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले.
बहुमताचे सरकार स्थापन करणार
भाजप सरकार आज भलेही विकासकामाचा दावा करीत असले तरी त्यात तथ्य नाही. भाजपने गोव्यात कोणताच विकास केलेला नाही. उलट येथील जनतेवर मोठय़ा प्रमाणात अन्याय झालेला आहे. भाजपला गोव्यातील जनता कंटाळली असून जनता पुन्हा एकदा गोव्यात काँग्रेसचे बहुमताचे सरकार स्थाप करणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
जर स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर अन्य पक्षाचा पाठिंबा घेणार का ? असा सवाल केला असता राहूल गांधी म्हणाले की, काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार यात कोणतीच शंका नाही. त्यामुळे अन्य पक्षाचा आधार घेण्याची जरूरी भासणार नाही. काँग्रेस पक्षाने बंडखोराना उमेदवारी दिलेली नाही. पक्षाने 80 टक्के नव्या चेहऱयांना संधी दिली आहे. लोकांकडून हीच मागणी होती व ती पक्षाने पूर्ण केलीय. आत्ता जनतेची जबाबदारी आहे ती या उमेदवारांना निवडून देण्याची.
यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, ज्ये÷ नेते पी. चिदंबरम, काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, एआयसीसीच्या प्रवक्त्या अलका लांबा, खा. फ्रान्सिस सार्दिन, अमरनाथ पणजीकर, सुनील कवठणकर उपस्थित होते.
‘गोव्यातील पर्यटन क्षेत्राची स्थिती वाईट आहे. आपण त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि या क्षेत्राला अर्थव्यवस्थेसाठी नवसंजीवनी देण्याची आणि त्यातून नोकऱयाही निर्माण करण्याची गरज आहे.’ एका प्रश्नाला उत्तर देताना गांधी म्हणाले की, आम्ही खाणकाम पुन्हा सुरू करण्याबाबत अभ्यास केला आहे आणि काँग्रेसचे सरकार आल्यावर ते पुन्हा सुरू केले जाईल. ‘आम्ही खनिज व्यवसाय कायदेशीर मार्गाने पुन्हा सुरू करू.
बेरोजगारीच्या मुद्यावर बोलताना म्हणाले की, भाजप सरकार हा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. ‘म्हणून आम्ही हा प्रश्न प्राधान्याने घेऊन तो सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही रोजगार निर्मितीसाठी 500 कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. याशिवाय, गोव्याला आयटी आणि नॉलेज हब बनवण्यासाठी आमचा प्रस्ताव आहे.’ रोजगार निर्मितीसाठी 500 कोटींची तरतूद कशी करणार असा सवाल केला असता ते म्हणाले की, पैसा कसा यायचा तसा येईल. त्यासाठी कोणीच चिंता करण्याची गरज नाही. यापूर्वी देखील काँग्रेस पक्षाने अशा गोष्टी साध्य केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हापसा येथील सभेत गोवा मुक्तीसाठी जवाहरलाल नेहरूंनी विलंब केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या संदर्भात प्रश्न उपस्थित केला असता, राहूल गांधी म्हणाले की, गोव्यात भाजप सरकार सर्व आघाडय़ावर अपयशी ठरले आहे. पर्यावरणच ऱहास झालेला आहे. कोळसा हब करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच थ्री लिनियर प्रकल्प असेच इतर अनेक समस्या आहेत. त्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हा मुद्दा उपस्थित करीत आहे.
मोदी 2 कोटी नोकऱया व 15 लाखांवर का बोलत नाही
केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी हे वर्षाला 2 कोटी नोकऱया निर्माण करण्यार आणि काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याची भाषा बोलत होते. लोकांना मोठी आश्वासने देत होते. या मुद्यावर ते आत्ता का बोलत नाही ते त्यांनी सांगावे.