पुन्हा मत दिल्यास सर्वसामान्य जनता होरपळणार : काँग्रेसचा सांबरा येथे प्रचार
प्रतिनिधी / बेळगाव
भाजपमुळे संपूर्ण देशामध्ये महागाईचा भडका उडाला आहे. पुन्हा जर त्यांना मत दिला तर आम्ही सर्वजणच या महागाईमध्ये होरपळणार असून याचा कोठेतरी गांभीर्याने विचार करा आणि काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे रहा, असे आवाहन काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी केले आहे.
सांबरा येथे सभा घेऊन त्यांनी आवाहन केले असून वेळीच भाजपला आवरा, अन्यथा तुम्हालाच त्याचा फटका बसणार हे निश्चित आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यासह जीवनावश्यक वस्तुंच्या महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे जीवन जगणेच अवघड झाले आहे. अशीच अवस्था राहिल्यास भविष्यात अन्नही मिळणार नाही. तेंव्हा भाजपच्या खोटय़ा आश्वासनांना बळी पडून तुम्ही तुमचे मत वाया घालू नका, असे सतीश जारकीहोळी यांनी मतदारांना सांगितले.
आमचा विजय हा निश्चित आहे. आमचा विजय होणार असल्यामुळे भाजप केविलवाणा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य जनता ही महागाईशी लढत आहे. त्यामुळे भाजपला त्याचा फटका बसणार हे निश्चित आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला मतदान करू नका, अन्यथा पुन्हा सर्वच जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढणार यात शंका नाही. भाजपने एकतरी आश्वासन पूर्ण केले आहे का? त्याचाही विचार करा. मतदान करा असे मी सांगणार नाही. मात्र तुम्हीच विचार करा आणि कोणत्या पक्षाला मतदान करायचे ते ठरवा, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ आश्वासनांची खैरात आजपर्यंत केली आहे. 15 लाख असू दे किंवा इतर आश्वासने असू दे त्यांनी किती पाळली आहेत हे पहा.
हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून जनतेची दिशाभूल करत आहेत. याचाही विचार होणे गरजेचे आहे. तेंव्हा सारासार विचार करून माझ्या पाठीशी ठामपणे उभे रहा, मी बेळगाव मतदार संघाचा कायापालट केल्याशिवाय राहणार आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. या सभेवेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, जिल्हा पंचायत माजी सदस्य नागेश देसाई यांच्यासह इतर नेतेमंडळी उपस्थित होती. गावातून प्रचार फेरीही यावेळी काढण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.