विरोधी पक्षांच्या टीकेवर केंद्र सरकारचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्या वाढलेल्या महागाई संदर्भात आरडाओरड सुरू आहे. जानेवारीच्या तुलनेत फेबुवारी महिन्यात महागाई दरात जवळपास पावणेदोन पट वाढ झाल्याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि, तात्पुरत्या काळापुरती ही परिस्थिती असली तरी, गेल्या सात वर्षांचा एकत्रित विचार करता पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात त्यांच्या मागच्या सरकारांच्या तुलनेत महागाई वाढीचा दर कमी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत केले.
वाढत्या महागाईसंबंधात विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. लोकसभेत मंगळवारी सरकारला जाब विचारण्यात आला. यावेळी गोयल यांनी आकडेवारी देऊन आपले म्हणणे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. गेल्या सात वर्षांमध्ये सर्वंकष विचार करता महागाई दर तुलनेने कमी आहे. मात्र, काही वस्तूंचे दर जास्त वाढलेले आहेत. मुख्य अन्नधान्यांचे दर नियंत्रणात राहिलेले आहेत. मात्र, डाळी आणि खाद्यतेल यांचे दर काहीवेळा तात्पुरत्या कालावधीसाठी वाढलेले आढळतात. त्यामुळे महागाई मोठय़ा प्रमाणात वाढल्याची भावना निर्माण होते, असे उत्तर यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला दिले. सरकार आपल्या पातळीवर दर कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. तथापि, काहीवेळा पुरवठय़ापेक्षा मागणी जास्त झाल्यास दर वाढतात. तसेच काहीवेळा वस्तू उपलब्ध असली तरी पुरवठा यंत्रणेतील अडचणींमुळे ती ग्राहकांपर्यंत पोहचू शकत नाही. मात्र, या अडचणी काही काळापुरत्याच असतात. सध्याही अशीच स्थिती असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.