कासेगाव वार्ताहर
वाळवा तालुक्यातील भाटवाडी येथील म्हातारा डोंगर परिसरातील जयवंत निकम यांच्या वस्तीवर रात्रीच्या दीड ते दोन च्या सुमारास बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. मात्र वस्तीवर मुक्कामी असलेल्या जयवंत निकम, तेजस निकम यांच्या प्रसंगावधानामुळे कुत्र्याची सुटका करण्यास यश आले.
भाटवाडी, काळमवाडी, नेर्ले, वाटेगाव येथे बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने परिसरातील बहुतांशी शेतकऱ्यांनी सजग होऊन जनावरांचे गोठे बंदिस्त केले आहेत. घटना घडलेल्या ठिकाणी देखील बंदिस्त गोठा आहे परंतु रात्री झोपण्यापूर्वी घाई गडबडीत दरवाजा खुला राहिल्यामुळे येथील कुत्र्यावर हल्ला झाला. मात्र बिबट्याची पकड घट्ट होण्यापूर्वीच शेजारीच झोपलेल्या जयवंत निकम, तेजस निकम, सरपंच नेताजी चव्हाण, हर्षल निकम यांना आवाजाने जाग आली व सर्वांनी आरडाओरडा केल्या नंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली व कुत्र्याचा जीव वाचला.
सर्पमित्र व प्राणीमित्र गणेश निकम, मीनाक्षी निकम यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांचे प्रबोधन केले. यावेळी निकम म्हणाले एखादा बिबट एखाद्या वस्तीवर जेव्हा भक्ष करतो त्यावेळेला तो अशा ठिकाणांना आपल्या भक्षाचे ठिकाण मानू लागतो व आपल्या थोड्याश्या चुकीमुळे त्याचा नैसर्गिक स्वभाव बदलतो. शिकार केलेल्या ठिकाणाहून दूर नेऊन शिकार खाणे हा बिबट्याचा स्वभाव आहे मात्र आपल्या हलगर्जीपणामुळे ज्या ठिकाणी शिकार केली आहे त्याच ठिकाणी बसून शिकार खाल्ल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. त्यामुळे सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे.
वनपाल सुरेश चरापले यांना याघटनेची माहिती दिली असून बिबट्याला जंगल व शेती यामधील फरक कळत नाही त्यामुळे नागरिकांनी जनावरे बंदिस्त गोठ्यात बांधावीत, रात्री शेतात जाताना हातामध्ये टॉर्च लावा, मोबाईल गाणे वाजवावे, शेतात बिबट्याची पिले आढळली तर त्वरीत वनविभागाला कळवावे व योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन चरापले यांनी केले आहे.