भारत-इंग्लंड विश्वचषकातील लढतीला बेन स्टोक्सचा उजाळा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गतवर्षी आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या साखळे फेरीत भारताला एकमेव पराभव स्वीकारावा लागला तो यजमान इंग्लंडविरुद्ध. त्या लढतीत भारताचा अति सावध पवित्रा आश्चर्याचा ठरला होता. नेमकी हीच बाब इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने आपल्या पुस्तकातून हेरली आहे. त्या लढतीत विराट कोहली-रोहित शर्मा यांचा दृष्टिकोन गोंधळात टाकणारा होता तर धोनीच्या खेळात पाठलाग करताना जानच नव्हती, असा दावा स्टोक्सने यात केला. कर्णधार विराटने मैदानातील एक सीमारेषा अवघ्या 59 मीटर्सवर असल्यावरुन टीका केली, ते देखील आश्चर्याचे होते, असे स्टोक्स आपल्या पुस्तकातून म्हणाला.
भारत-यजमान इंग्लंड यांच्यातील ती लढत बर्मिंगहममध्ये झाली, त्यात इंग्लंडच्या 7 बाद 337 या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा 31 धावांनी पराभव झाला. त्या लढतीचा उल्लेख करत ‘ऑन फायर’ या पुस्तकातून स्टोक्सने भारतीय खेळाडूंचा विशेष समाचार घेतला. हेडलाईन्स बूक या प्रकाशन संस्थेने सदर पुस्तक प्रकाशित केले असून भारतातील वितरणाचे हक्क हॅशेट इंडियाकडे आहेत.
‘बर्मिंगहममधील त्या लढतीत धोनी फलंदाजीला उतरला, त्यावेळी भारताला 11 षटकात 112 धावांची गरज होती. पण, धोनी ज्या सावधतेने, मंद गतीने खेळला, ते धक्कादायक होते. जिथे षटकार मारण्याची गरज होती, तेथे धोनी एकेरी धावा घेत असल्याचे पाहून आम्हा सर्वांनाच धक्का बसला. वास्तविक, त्यांचे खेळाडू आपल्या लौकिकाला साजेशे खेळले असते तर भारताने किमान डझनभर चेंडू राखूनच तो सामना जिंकला असता. धोनीच्या खेळात किंवा त्याचा सहकारी केदार जाधवच्या खेळात तर जानच नव्हती. जेथे विजय मिळवणे शक्य होते, तेथे भारतीय खेळाडूंनी कच खाल्ली’, असे निरीक्षण स्टोक्सने येथे नोंदवले.
धोनीने त्या सामन्यात 31 चेंडूत 42 धावा केल्या. पण, यातील बऱयाच धावा शेवटच्या षटकातील होत्या, ज्यावेळी भारत जिंकू शकणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाले होते.
‘धोनीची स्वतःची वेगळी पद्धत आहे. ज्यावेळी सामना जिंकता येत नाही, हे लक्षात येते, त्यावेळी देखील तो संघाची धावसरासरी सरस कशी राखता येईल, इकडे लक्ष केंद्रित करुन असतो. शेवटच्या षटकाअखेर क्रीझवर थांबून विजय मिळवण्याचा प्रयत्न त्या लढतीतही असेल. पण, तो अपेक्षित खेळ उंचावू शकला नाही, हे वास्तव आहे’, असे निरीक्षण स्टोक्सने नोंदवले.
रोहित-कोहलीवरही टीकास्त्र
138 धावांची भागीदारी करण्यासाठी तब्बल 27 षटके ‘खाणाऱया’ रोहित शर्मा व विराट कोहली या जोडीवर देखील स्टोक्सने यातून टीका केली. आश्चर्य म्हणजे या 27 मधील बरीच षटके ख्रिस वोक्स व जोफ्रा आर्चर यांनी टाकली होती.
‘विराट व रोहित जसे खेळले, ते गोंधळात टाकणारे होते. यादरम्यान आमची गोलंदाजी उत्तम होती, पण, त्यांनी ज्याप्रकारे जणू तलवारीच म्यान केल्या, ते धक्का देणारे होते. माझ्या मते त्यांनी आम्हाला सामन्यावर सहज वर्चस्व करु दिले. सामन्यानंतर विराट कोहलीने छोटय़ा सीमारेषेबद्दल जी तक्रार केली, तो तर एक कहरच होता. यापेक्षा आणखी कोणतीही दर्जाहीन तक्रार असू शकत नाही. दोन्ही संघ त्याच मैदानावर खेळतात, दोन्ही संघांना तितकेच चेंडू मिळतात. त्यामुळे, सीमारेषा किती अंतरावर आहे, याने काय फरक पडतो’, असा प्रश्न स्टोक्सने शेवटी उपस्थित केला.
भारत-इंग्लंड यांच्या त्या लढतीचा संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : 50 षटकात 7-337 (जॉनी बेयरस्टो 109 चेंडूत 10 चौकार, 6 षटकारांसह 111, जेसॉन रॉय 57 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह 66, बेन स्टोक्स 54 चेंडूत 6 चेंडू, 3 षटकारांसह 79. अवांतर 8. मोहम्मद शमी 10 षटकात 5-69, बुमराह 10 षटकात 1-44, कुलदीप 10 षटकात 1-72).
भारत : 50 षटकात 5-306 (रोहित शर्मा 109 चेंडूत 15 चौकारांसह 102, विराट कोहली 76 चेंडूत 6 चौकारांसह 66, पंडय़ा 33 चेंडूत 45, धोनी 31 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह नाबाद 42, केदार जाधव 13 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 12. अवांतर 7. प्लंकेट 3-55, वोक्स 2-58).