आझादमैदानावरीलसभेतविद्यार्थ्यांचीघोषणा,
प्रतिनिधी/ पणजी
केंद्र सरकारने आखलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील कित्येक चांगल्या पैलूंची अंमलबजावणी होईपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बसणार नाही. भारताच्या खऱया इतिहासाला अभ्यासक्रमात स्थान देऊन इतिहासाची विद्यमान पुस्तके रद्दबातल करा, अशी घोषणा विद्यार्थ्यांनी येथील आझाद मैदानावर झालेल्या जाहीर सभेवेळी केली. यावेळी स्वातंत्र्यसैनिक शारदाताई सावईकर यांचा सन्मान करून सर्व स्वातंत्र्यवीरांकडून स्फूर्ती घेण्याचे वचन विद्यार्थ्यांनी दिले.
पणजी बसस्थानकावरून घोषणाबाजी करीत सुरू झालेल्या रॅलीची आझाद मैदानावर जाहीर सभेत सांगता झाली. या जाहीर सभेत मंचावर कोकण प्रांत प्रदेश अध्यक्ष श्रीकांत दुदगीकर, प्रदेश मंत्री अमित डोमसे, राष्ट्रीय महमंत्री निधी त्रिपाठी, विद्यार्थी नेते नीरज कुरकुटे, शिवम नाईक, तनया पारकर, सुरज लोकरे उपस्थित होते. त्यांनी केंद्र सरकार तसेच गोवा आणि महाराष्ट्र सरकारकडून अभाविपला असलेल्या अपेक्षा मांडल्या. गोव्यात आयआयटी स्थापन झाली. पण त्यासाठी अजून इमारत देण्यास सरकारला साध्य झालेले नाही. फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील अपुऱया जागेत सुविधांअभावी आयआयटी चालवली जात असल्याने खंत व्यक्त करण्यात आली. संपूर्ण कोकण प्रदेशात मासेमारी प्रमुख व्यवसाय आहे. पण गोव्यासह कोणत्याही विद्यापीठात मत्स्यउत्पादनावर अभ्यासक्रम नाही. विदेशात या विषयावर पीएचडी करता येते. हा विषय अभ्यासक्रमात हवा, अशी मागणी करण्यात आली.
भारताचा चुकीचा इतिहास इतकी वर्षे शाळा-कॉलेजात शिकवण्यात आला. ही सर्व पुस्तके रद्द करून आता खरा इतिहास शिकवणे आवश्यक असल्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात अला. राष्टीय शैक्षणिक धोरणातील चांगल्या बाबींची अजून अंमलबजावणी होत नसल्याने खंत व्यक्त करण्यात आली. शबानी शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण आवश्यक असून फक्त नोकरी मिळविण्यासाठीच शिक्षणावर भर देऊ नये. सर्वांगीण विकासासाठी शिक्षण द्या व भारताला स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सकाळी पर्वरी येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना केले. गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन पीठ स्थापन करून खरा इतिहास शोधण्याचे काम इतिहास संशोधक विद्यार्थ्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांनी मेळघाटमधील आपल्या सामाजिक कार्याचा अनुभव सांगताना अभाविपचे संस्कार असल्यामुळे हे कार्य आपल्याला शक्य झाले, असे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रा. निधी त्रिपाठी, प्रा. श्रीकांत दुदगीकर, अमित ठोमसे, संजय वालावलकर, डॉ. भूषण भावे, नरेंद्र सावईकर, सर्वेश तळवडकर आदी उपस्थित होते. प्रा. दत्ता भि. नाईक यांच्या ‘युवा प्रेरणा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्या हस्ते झाले. सर्वप्रथम स्वागत समिती अध्यक्ष संजय वालावलकर यांनी स्वागत केले. अमित ठोमसे यांनी विचार मांडले. अद्वैता बापट यांनी गीत गायन सादर केले. तर डॉ. भूषण भावे यांनी सूत्रसंचालन व मान्यवरांचा परिचय करून दिला. सर्वो तळवडकर यांनी आभार मानले.