ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
डिझेल ट्रॅक्टरमधून सीएनजीमध्ये रूपांतरित झालेल्या भारतातील पहिल्या-वहिल्या ट्रॅक्टरचे औपचारिक उद्घाटन उद्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
उद्या रॉमट्ट टेक्नो सोल्यूशन्स आणि टोमॅसेटो अचिल्ल इंडिया यांनी संयुक्तपणे केलेले हे रूपांतरण, शेतकऱ्यांना कमी खर्चात उत्पन्न वाढविण्यास आणि ग्रामीण भारतात नोकरीच्या संधी निर्माण करण्यास मदत करेल. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर, पार्शोत्तम रुपाला आणि जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग हेदेखील या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
इंधन खर्चावर वर्षाकाठी एक लाखाहून अधिक रुपयांची बचत करण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
- सीएनजीमध्ये रूपांतरणाचे महत्त्वपूर्ण फायदे :
- कार्बन व इतर प्रदूषक घटकांचे प्रमाण कमी असल्याने हे स्वच्छ इंधन आहे.
- हे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे कारण यात शिसे नसून ते न गंजणारे, संहत आणि प्रदूषण न करणारे असल्यामुळे इंजिनचे आयुष्य वाढविण्यात मदत करण्याबरोबरच नियमित देखभालही कमी करावी लागते.
- सतत चढ-उतार होणाऱ्या पेट्रोलच्या दरापेक्षा सीएनजीचे दर बऱ्याचदा स्थिर असल्याने ते स्वस्त आहे; डिझेल / पेट्रोल वरील वाहनांपेक्षा सीएनजी वरील वाहनांचे सरासरी माइलेज चांगले आहे.
- चाचणी अहवालात असे दिसून येते की डिझेलवरील इंजिनच्या तुलनेत रेट्रोफिटेड ट्रॅक्टर जास्त किंवा सारख्याच शक्तीने चालतो.
- डिझेलच्या तुलनेत एकूण उत्सर्जन 70% कमी झाले आहे.