काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल : शेतकरी आंदोलनप्रश्नी घेतली राष्ट्रपतींची भेट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नवे कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी मध्यस्थी करण्याची मागणी करत काँग्रेस नेत्यांनी गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. दरम्यान, राष्ट्रपतींच्या भेटीपूर्वी पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा रोखत प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेत कारवाई केली. फक्त तीनच नेत्यांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले. देशात सध्या लोकशाही अस्तित्वात नाही. सध्याची लोकशाही काल्पनिक असल्याचा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधानांना विरोध करणाऱया प्रत्येकाला दहशतवादी ठरविले जाते. उद्या सरसंघचालक मोहन भागवत यांनी जरी पंतप्रधानांच्या विरोधी भूमिका घेतली तर त्यांनाही दहशतवादी ठरविले जाईल, अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली.
काँग्रेसचा मोर्चा अडविला
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे खासदार मोर्चाने विजय चौकातून राष्ट्रपती भवन येथे निघाले होते. काँग्रेसचे शिष्टमंडळ शेतकरी आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी करणारे 2 कोटी सहय़ांचे निवेदन राष्ट्रपतींना सादर करणार होते. मात्र, त्यापूर्वीच राहुल व प्रियंका गांधी वधेरा यांच्यासह काँग्रेस खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
केवळ लोकशाहीचा आभास
भारतात लोकशाही शिल्लक नाही. जे काही आहे तो लोकशाहीचा आभास आहे. पंतप्रधान केवळ मूठभर भांडवलदारांच्या तुंबडय़ा भरण्यात मग्न आहेत. त्यांना जो कोणी विरोध करेल, त्याला मोदी समर्थकांकडून दहशतवादी ठरविले जात आहे. शेतकरी, कष्टकऱयांसह इतरांनाही भविष्यात दहशतवादी ठरविले जाईल, अशी उपहासात्मक टीका राहुल गांधी यांनी केली.
कोरोनामुळे देशाचे नुकसान होणार असल्याचा इशारा आपण सर्वप्रथम दिला होता. पण आपल्या म्हणण्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले गेले. आताही तशीच स्थिती निर्माण केली जात आहे, असे ते म्हणाले.
शेतकरी, मजुरांसमोर कोणतीही शक्ती उभी राहू शकत नाही. जर पंतप्रधानांनी नवे कृषी कायदे मागे घेतले नाही तर फक्त भाजप, आरएसएस नाही तर देशाचे नुकसान होणार आहे,’’ असा इशारा राहुल गांधी यांनी यावेळी दिला. तसेच कायदे मागे घेण्यासाठी संसदेचे संयुक्त विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही त्यांनी केली.
सरकारचे धोरण ‘उद्योगपती’पूरक!
भाजप आणि नरेंद्र मोदींचे एकच ध्येय असून ते शेतकरी आणि मजुरांनाही समजले आहे. आपल्या आसपास जे दोन चार मोठे उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी पैसे उभे करण्याचे काम पंतप्रधान करतात. त्यांच्याकडे संपूर्ण भारत सोपवला आहे. विरोध करणाऱयांना येथे दहशतवादी ठरवले जाते, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.