चीनमधून जगभरात फैलावलेल्या कोरोना विषाणूचा प्रभाव आता भारतात वेगाने पहावयास मिळत आहे. भारतात समूह संसर्गाचा धोका वाढल्याचेही म्हटले जाऊ लागले होते. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने भारतात समूह संसर्गाचा धोका नसल्याचे स्पष्ट पेले आहे.
कोरोना विषाणूसंबंधी तयार करण्यात आलेल्या अहवालात चूक झाल्याने भारतात समूह संसर्ग होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु भारतात समूह संसर्गाचा धोका नसून क्लस्टर ऑफ केसेस वाढल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे.
भारतातील काही भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने त्याला क्लस्टर ऑफ केस म्हटले जाते. अहवालात चुकून समूह संसर्गाचा उल्लेख करण्यात आल्याने भारतात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल समोर आल्यावर भारताने स्वतःचा आक्षेप नोंदवून कोरोना संसर्ग तिसऱया टप्प्यात पोहोचला नसल्याची भूमिका मांडली होती.
भारतातील जवळपास 700 पैकी 400 जिल्हय़ांमध्ये कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. 133 जिल्हय़ांना हॉटस्पॉट करण्यात आले असून तेथे विशेष नजर ठेवली जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे.