पाकिस्तानी दहशतवाद्यांची तालिबानशी गुप्त बैठक, भारतीय सुरक्षा यंत्रणांसह गुप्तचर यंत्रणाही अलर्ट
कंधार
अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि आयएसआयएसच्या कुरापती वाढल्यानंतर आता बऱयाच देशांमध्ये असुरक्षितता पसरली आहे. भारतालाही तालिबानी दहशतवाद्यांपासून धोका असून काश्मीर किंवा अन्यत्र मोठा हल्ला चढवला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी काही दिवसांपूर्वी तालिबान नेत्यांना भेटण्यासाठी कंधारला गेले होते. या चर्चेदरम्यान, जैश-ए-मोहम्मदने तालिबानची भारतातील कारवाया करण्यासाठी मदत मागितली आहे. पाकिस्तानातून आलेले दोन दहशतवादी श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहितीही मिळाली आहे. त्यामुळे सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. तसेच गुप्तचर संस्थांनाही सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणाही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज असल्या तरी पुढील काही दिवस अतिदक्षता पाळावी लागणार आहे.