नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जवळपास 50 किलोमीटरपर्यंत मारा करू शकणारी हॉवित्झर तोफ भारताने विकसित केली आहे. संरक्षण संशोधन विकास संस्थेने (‘डीआरडीओ’) ही चोख कामगिरी बजावली ‘आत्मनिर्भर भारत’ची चमक दाखवून दिली आहे. ‘डीआरडीओ’च्या या कामगिरीमुळे भविष्यात भारताला तोफा आयात करण्याची आवश्यकता भासणार नसल्याचा दावा केला जात आहे.
स्वदेशी बनावटीची अटॅग्ज (एटीएजीएस) हॉवित्झर ही जगातील सर्वोत्तम तोफ आहे. दूरवरच्या 48 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर प्रहार करण्याची या तोफेची क्षमता आहे, असे ‘डीआरडीओ’च्या वैज्ञानिकाने सांगितले. स्वदेशी बनावटीची ही तोफ भारतीय लष्कराच्या सर्व गरजा पूर्ण करु शकते. या क्षेत्रात आयातीची आवश्यकता नाही’’ असे अटॅग्ज हॉवित्झर तोफ प्रकल्पाचे संचालक आणि डीआरडीओचे वरि÷ वैज्ञानिक शैलेंद्र व्ही. गाडे यांनी चाचणी यशस्वी पार पडल्यानंतर स्पष्ट केले. आतापर्यंत चीनच्या सीमेसह सिक्कीम आणि पाकिस्तान सीमेजवळ पोखरण येथे अटॅग्ज हॉवित्झरमधून दोन हजार राऊंड्सची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. या सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्यामुळे या तोफेचा आता लष्करातील समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारतीय लष्करात वापरात असलेली बोफोर्स आणि इस्रायलने देऊ केलेल्या ‘ऍथोस’ तोफेपेक्षा अटॅग्ज हॉवित्झरमधील यंत्रणा अधिक चांगली आहे. लष्करात याचा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने वापर होऊ शकतो, असा आशावाद गाडे यांनी व्यक्त केला आहे. कारगील युद्धात पाकिस्तानवरील विजयात बोफोर्स तोफांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता भविष्यात युद्धस्थिती निर्माण झाल्यास ‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या अटॅग्ज हॉवित्झर तोफांचा वापर केला जाऊ शकतो.