पंतप्रधान मोदी यांची पुतीन, झेलेन्स्की यांच्याशी चर्चा, काही भागांमध्ये रशियाकडून शस्त्रसंधी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युपेनमध्ये अद्यापही अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सहकार्य करावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना केली आहे. सोमवारी त्यांनी या दोन्ही नेत्यांशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. युक्रेनच्या सुमी भागात अद्यापही 400 हून अधिक भारतीय अडकले आहेत. त्यांना सुरक्षित मार्ग द्यावा आणि त्यांना युक्रेनच्या सीमारेषेपर्यंत सुखरुप जाऊ द्यावे, अशी मागणी पंतप्रधान मोदींनी केली.
पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात 50 मिनिटांहून अधिक काळ चर्चा झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील परिस्थिती आणि तत्संबंधी इतर मुद्दय़ांवरही विचारविमर्श केला. युद्ध त्वरित थांबवावे आणि युक्रेन आणि रशिया यांनी सामोपचाराच्या मार्गाने समस्यांची उकल करावी, असे आग्रही आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. गुंता सोडविण्यासाठी चर्चेचा मार्ग हाच सर्वात प्रभावी ठरेल, असेही ठाम प्रतिपादन त्यांनी केल्याचे समजते.
झेलेन्स्की यांच्याशी चर्चा
झेलेन्स्की यांच्याशीही पंतप्रधान मोदी यांची 35 मिनिटांहून अधिक काळ चर्चा झाली. युक्रेनच्या काही भागात अद्यापही भारतीय नागरीक आणि विद्यार्थी अडकले आहेत. युपेन प्रशासनाने त्यांना सुरक्षितपणे सीमेपर्यंत पोहचण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. झेलेन्स्कींनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. भारतीयांची सुटका करण्यासाठीचे अभियान सोमवारी सुरु राहिले. आज मंगळवारीही 400 हून अधिक भारतीयांची सुटका करण्याची सज्जता आहे.
चीनची हस्तक्षेपाची तयारी
युपेन आणि रशिया यांच्यात मध्यस्थी करण्याची तयारी चीनने दर्शविली आहे. दोन्ही देशांची तयारी असल्यास चीन हे उत्तरदायित्व स्वीकारु शकतो, असे त्या देशाने स्पष्ट केले आहे. अन्य देशांशी सशस्त्र संघर्ष करण्याच्या मुद्दय़ावर चीन कायद्याचा आधारही घेऊ शकतो, असे विधान चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चीनचा आंतरराष्ट्रीय संघर्षांमध्ये हस्तक्षेप भविष्याकळासाठी घातक ठरु शकतो, असेही अनेक तज्ञांचे मत आहे.
तुर्कस्थानच्या अध्यक्षांची चर्चा
तुर्कस्थानचे अध्यक्ष एर्दोगन यांनीही युक्रेन आणि रशियाशी संपर्क ठेवला आहे. युद्धबंदी करुन यापुढच्या काळात चर्चेच्या मार्गाने समस्या सोडविल्या जाव्यात, असे आवाहन त्यांनी सर्व संबंधितांना केले. तुर्कस्थान रशियाशी संबंध तोडणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. तेच धोरण ठेवण्यात आले आहे.
युक्रेनमध्ये हिंसाचार सुरुच
युक्रेनमध्ये रशियाचे हल्ले सुरुच आहेत. मात्र, त्यांची तीव्रता काहीही कमी झाली आहे. युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली असून नागरिकांनी पलायन केले आहे. 15 लाख लोकांनी देश सोडला आहे, असे स्पष्ट करण्यात आले. युपेनच्या ग्रामीण भागातही रशियाने प्रवेश केला असून तेथे मोठय़ा प्रमाणात हानी होत आहे. खार्किव्ह शहर पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे. रशियाकडून हल्ल्यासाठी प्रबळ क्षमतेचे बाँब, क्षेपणास्त्रे आणि इतर अत्याधुनिक स्फोटकांचा उपयोग केला जात आहे. राजधानी कीव्हच्या उपनगरांमध्ये आता रशियन सेनेचा प्रवेश झाला असून तेथे हानी होत आहे. ओडेसा या शहरात युक्रेनच्या नागरिकांनी रशियन सैन्याचा कडवा प्रतिकार चालविला असून इतर शहरांमध्येही असे चित्र दिसत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी स्पष्ट केले. युक्रेनने अमेरिका व इतर युरोपियन देशांकडून अधिक शस्त्रास्त्रांची मागणी केल्याचेही वृत्त आहे.
युद्धगुन्हय़ांची चौकशी होणार
रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण करुन स्थानिक जनतेवर मोठय़ा प्रमाणात युद्धगुन्हे केले आहेत. या गुन्हय़ांची चौकशी केली जाईल. आम्ही रशियासमोर झुकणार नाही. संघर्ष सुरुच ठेवला जाईल. रशियाला त्याच्या कृत्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, अशी ठाम भूमिका युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी घेतली.
वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात
युक्रेनने रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. युक्रेनच्या अभियोगाची दखल या न्यायालयाने घेतली असून सुनावणीला सोमवारी प्रारंभ झाला. आंतरराष्ट्रीय न्यायालय हॉलंड येथील हेग येथे आहे. रशियावर दबाव आणण्यासाठी युक्रेनने हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बहुतेक भारतीयांची सुटका
भारताने गंगा अभियानाअंतर्गत आतापर्यंत 10 हजारांहून अधिक भारतीय नागरिकांची सुटका केली असून हे नागरिक भारतात परतले आहेत. सोमवारी 400 हून अधिक भारतीय मायदेशी परतले. मंगळवारीही आणखी 400 हून अधिक जणांची सुटका करण्यात येईल, अशी माहिती विदेश विभागाने दिली आहे. खार्किव्ह आणि सुमी हे दोन प्रदेश वगळता ऊर्वरित युक्रेनमधून बव्हंशी सर्व भारतीयांनी शेजारच्या देशांमध्ये प्रवेश केल्याने ते सुरक्षित आहेत. त्यांना टप्प्याटप्प्याने भारतात आणण्यात येत आहे. भारताने यासाठी खासगी विमान कंपन्यांची विमाने आणि भारतीय वायुदलाची विमाने उपयोगात आणली आहेत.
जखमी विद्यार्थी भारतात
कीव्ह येथे काही दिवसांपूर्वी गोळीबारात जखमी झालेला विद्यार्थी हरज्योत सिंग याला सोमवारी भारतात आणण्यात आले आहे. तो रशियन सैनिकांच्या गोळीबारात जखमी झाला होता. त्याच्यावर युक्रेनमध्येच उपचार सुरु होते. त्याला रविवारी सीमेपार पोलंडमध्ये हलविण्यात आले. नंतर भारतात आणण्यात आले.
आता प्रश्न दोन भागांचाच…
ड खार्किव्ह आणि सुमी या दोनच भागांमध्ये अडकले आहेत भारतीय
ड भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारच्या वतीने प्रयत्नांची पराकाष्ठा
ड युक्रेनच्या अनेक भागात प्रचंड हानी, नागरिकांकडूनच मोठा प्रतिकार