वृत्तसंस्था/ लंडन
कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने सोमवारी लंडनकडे प्रयाण केले. नॉटींगहॅममधील पहिली कसोटी रविवारी अनिर्णित अवस्थेत संपली. आता उभय संघात दुसरी कसोटी लॉर्डस् मैदानावर 12 ऑगस्टपासून खेळविली जाणार आहे. दरम्यान भारतीय संघातील बदली खेळाडू सुर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांना क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करण्यासाठी नॉटींगहॅममध्ये रहावे लागत आहे.
भारतीय क्रिकेट संघ नॉटींगहॅममधून स्थानिक प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी 11 वाजता लंडनकडे रवाना झाले. लंडनला जाण्यापूर्वी भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये प्रत्येक खेळाडू निगेटिव्ह असल्याचे आढळून आले. नॉटींगहॅम कसोटीसाठी भारतीय संघाच्या संपर्कात असलेले सुर्यकुमार यादव आणि शॉ यांना आपल्या 10 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पुरा करावा लागणार असून 13 ऑगस्टला हा कालावधी पूर्ण होणार आहे. त्यानंतर ते 14 ऑगस्टला लंडनला रवाना होतील. या मालिकेतील 25 ऑगस्टपासून सुरू होणाऱया तिसऱया कसोटीसाठी हे दोन्ही खेळाडू निवडीसाठी उपलब्ध राहतील. दुसऱया आणि तिसऱया कसोटीत नऊ दिवसांचा कालावधी असल्याने या कालावधीत यादव आणि शॉ यांना सरावाची संधी संघ व्यवस्थापनाकडून उपलब्ध करून दिली जाईल.
गांगुली उपस्थित राहणार
लॉर्डस्च्या मैदानावर 12 ऑगस्टपासून सुरू होणाऱया दुसऱया कसोटीवेळी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरभ गांगुली उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी गांगुली लंडनकडे प्रयाण करतील. ब्रिटनमध्ये कोरोना संदर्भातील नियमानुसार ज्यांनी कोरोनाच्या दोन लसी घेतल्या आहेत, त्यांना 10 दिवसांच्या क्वारंटाईनची गरज राहणार नाही. कोलंबोतून पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव यांचे कमर्शियल फ्लाईटने लंडनमध्ये आगमन झाल्याने त्यांना क्वारंटाईनमध्ये रहावे लागत आहे. भारतीय क्रिकेट मंडळाचे सचिव जय शहा, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि खजिनदार अरूण धुमल हे या कसोटी मालिकेतील काही सामन्याला उपस्थित राहणार असल्याचे समजते.