उत्तर ध्रुवावरून उड्डाण करत थेट बेंगळूरपर्यंत झेप : ‘एअर इंडिया’ची गगनभरारी
बेंगळूर / वृत्तसंस्था
एअर इंडियाच्या महिला वैमानिकांच्या पथकाने भारतीय हवाई दलात नवा इतिहास निर्माण केला आहे. जगातील सर्वात लांब हवाई मार्गावरील उत्तर ध्रुवावर उड्डाण करून नवा इतिहास रचला आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथून रविवारी उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचे विमान सोमवारी पहाटे उत्तर ध्रुवमार्गे बेंगळूर येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. या प्रवासादरम्यान सुमारे 14 हजार किमीचे अंतर त्यांनी पार केले. या संपूर्ण मार्गावर केवळ चार महिला वैमानिकांनी सारथ्य करत ‘एआय-176’ विमान सुखरुपपणे भारताच्या भूमीपर्यंत आणले आहे.
सॅन फ्रान्सिस्को ते बेंगळूरपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 17 तास लागले. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी विमान बेंगळूर विमानतळावर दाखल झाले होते. या मार्गावर एआय 176 हे विमान पूर्णपणे महिला वैमानिक चालवत होत्या. वैमानिकांच्या टीममध्ये कॅप्टन झोया अग्रवाल, कॅप्टन पापागरी थन्मई, कॅप्टन शिवानी मन्हास आणि कॅप्टन आकांक्षा सोनवणे यांचा समावेश होता. वैमानिकांचे नेतृत्त्व झोया अग्रवाल यांनी केले. या विमानाची प्रवासी क्षमता 238 इतकी असून 4 वैमानिक आणि 12 इतर कर्मचाऱयांचा समावेश त्यात असतो.
भारतीय महिला अनेक गोष्टींद्वारे जगभरात आपल्या देशाचा अभिमान वाढवत आहेत. आता भारतीय महिला वैमानिकांनीही आपली शक्ती दाखवत ‘हम भी किसी से कम नहीं’ अशी ताकद जगाला दाखवली आहे. विमान भारतात दाखल होताच ‘एअर इंडिया’च्या ट्विटर हँडलरने स्वागत करण्यात आले. एअर इंडियाने ट्विट करुन ‘वेलकम होम, आम्हाला तुमच्या सर्वांचा अभिमान आहे’’ असा संदेश लिहिला आहे. “या ऐतिहासिक प्रवासाचा एक भाग बनलेल्या एआय 176 च्या प्रवाशांचे आम्ही अभिनंदन करतो’’ असेही ट्विट एअर इंडियाने केले आहे.
‘वंदे भारत मिशन’ला महत्त्व
सॅन फ्रान्सिस्कोवरून बेंगळूरपर्यंत महिला वैमानिकांनी ऐतिहासिक उड्डाण घेतल्यामुळे वंदे भारत मिशनला आणखी महत्त्व आले आहे. या मिशनद्वारे आतापर्यंत 46.5 लाखाहून अधिक लोकांना आंतरराष्ट्रीय सुविधा देण्यात आली आहे, असे नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही महिला वैमानिकांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
वैमानिकांचा आनंद गगनात मावेना!
बेंगळूर विमानतळावर उतरल्यानंतर कॅप्टन झोया अग्रवाल यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. ‘आज आम्ही फक्त उत्तर ध्रुवावर उड्डाण केले असे नाही तर महिला वैमानिकांनी यशस्वीरित्या हे कार्य करून जगात नवा इतिहास घडविला आहे. या ऐतिहासिक कामगिरीचा एक भाग असल्याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे’’ असे त्या म्हणाल्या. या उड्डाणामुळे 10 टन इंधनाची बचत झाल्याची माहितीही त्यांनी दिली. वैमानिकांच्या पथकातील अन्य एक पायलट शिवानी यांनी या अनुभवानंतर प्रतिक्रिया देताना ‘आम्हा सर्वांसाठी हा एक रोमांचक अनुभव होता’ असे म्हटले आहे.