ऑनलाईन/टीम
भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. यशपाल शर्मा यांनी भारताला १९८३ चा वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा होता. १९८३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध शर्मा यांनी ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. तसेच त्यांनी ३७ कसोटींत १६०६ धावा, ४२ वन डेत ८८३ धावा केल्या होत्या.
यशपाल शर्मा यांनी १९७२ मध्ये पंजाबच्या शालेय संघाकडून खेळताना जम्मू-काश्मीर संघाविरुद्ध २६० धावांची खेळी केली होती आणि तेव्हा ते चर्चेत आले. त्यानंतर दोन वर्षांत त्यांची राज्याच्या संघात निवड झाली आणि नॉर्थ झोन संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी विझ्झी ट्रॉफी जिंकली.