पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलानाचे उद्घाटन
कोल्हापूर प्रतिनिधी
संतांची भूमी असलेल्या भारतीय परंपरेतील संतांनी अखंड विश्वाच्या कल्याणाचा विचार केला आहे. प्रत्येक संताने विचार मांडताना मानवतावादावरच भर दिला आहे. प्रत्येक संताची भाषा वेगवेगळी असली तरी मानवजातीचे कल्याण हेच त्यांचे कार्य आणि उद्दीष्ट होते. आजच्या जगाला संतांच्या विचाराचीच गरज आहे. त्यामुळे भारतीय संत, त्यांचे विचार आणि साहित्याचा प्रसार, प्रचार देश-विदेशात करा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
उदयपूर पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, भारत सरकार, संस्कृती मंत्रालय आणि मुंबई इंडसमून मिडिया प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल कोश्यारी यांनी मार्गदर्शन केले. येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या उद्घाटन सोहळय़ाला संमेलनाध्यक्ष ह. भ. प. न्यायमूर्ती डॉ. मदन महाराज गोसावी आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक व संमेलाचे स्वागताध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या भाषणात भारतीय वेद, उपनिषदे, भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरू नानक यांच्यासह संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, रामदास, सूरदास, तुलसीदास, कबीर, पुरंदरदास यांच्या विचार कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, भगवान गौतम बुद्धांनी सर्वस्वाचा त्याग करत जगाच्या उद्धारासाठी बौद्ध धर्माची स्थापना केली. हा धर्म चीन, जपान, मलेशया, थायलंडसह जगातील असंख्य देशात पसरला. गौतम बुद्ध विश्वात्मक बनले. भगवान महावीरांनीही मानवतावादाच्या आधारे जगण्याची पद्धत शिकवली. आपल्या देशातील विविध प्रांतात झालेल्या संतांच्या भाषा वेगवेगळय़ा होत्या, पण त्यांचे विचार मानवतावादाचे, जगाच्या कल्याणाचे होते. सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी वसुधैव कुटुंबकम हा विचार मांडताना विश्व हेच कुटुंब असल्याचे म्हटले. विश्वाच्या कल्याणाचा विचार सांगणाऱया या संतांनी सर्वे सुखिन संतु हा विचार दिला. ‘हम सब का सुख चाहते है’ हेच त्यांचे अंतिम उद्दीष्ट होते. या संतांच्या विचारावर परदेशात वीसहून अधिक संशोधक अभ्यासक करत आहेत. भारतीय संत परंपरा, संत साहित्याचा विचार देश-विदेशात पोहचविण्याची गरज आहे. ती या संमेलानाच्या माध्यमातून पूर्ण होईल, अशी अपेक्षा असल्याचेही राज्यपाल कोश्यारी म्हणाले.
शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंदांचा गौरव
आद्य शंकराचार्यांची चारो धामची उभारणी करून आपल्या विशाल देशाला जोडण्याचे कार्य केले. संतपदाला पोहचलेली व्यक्तीच कमी आयुष्यात हे करू शकते, याकडे लक्ष वेधत राज्यपाल कोश्यारी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या धर्मकार्यावरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, धर्म समजायचा असेल तर भारतात यावे लागेल, असे आवाहन शिकागोच्या धर्म परिषदेत केले होते. त्याचवेळी चीनसारखा देश जगासाठी धोकादायक असल्याचे इशाराही शंभर वर्षापूर्वी दिला होता. यातून त्यांची दृष्टी दिसते, असेही कोश्यारी यांनी सांगितले.
संमेलन करेल जगाला भारतीय संस्कृतीविषयी मार्गदर्शन
स्वागताध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणाले, पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाची सुरूवात न्यायमूर्ती डॉ. मदन महाराज गोसावी यांनी करून नवीन परंपरा सुरू केली आहे. अखंड विश्वात संतांचे साहित्य लोकमाध्यमातून पुढे घेवून जाण्यास आम्ही आग्रही आहोत. राजकारणापलिकडे जावून संतांची परंपरा जपण्याचे काम देश करीत आहे. सूर्य एकटा असला तरी साऱया विश्वाला प्रकाश देतो. त्याप्रमाणे हे विश्वात्मक साहित्य संमेलन जगाला भारतीय संस्कृतीविषयी मार्गदर्शन करत राहील.
अस्वस्थतेच्या काळात संमेलन विश्वबंधूतेचा राजमार्ग : डॉ. गोसावी
संमेलनाध्यक्षपदी न्यायमूर्ती डॉ. मदन महाराज गोसावी म्हणाले, उपनिषदे भारतीय तत्वज्ञानाचे मूळ स्त्रोत आहेत. ऋषीमुनींनी त्यांची निर्मिती केली आहे. भगवद्गीता तर सामाजिक, सांस्कृतिक समानतेचा धागा आहे. संतांच्या विचारांची मांडणी करण्यासाठी विश्वात्मक संत साहित्याचे व्यासपीठ निर्माण केले आहे. आजच्या अस्वस्थतेच्या काळात हे संमेलन विश्वबंधूता व समानता ठेवण्याचा राजमार्ग ठरेल. सर्व संप्रदायांमध्ये भागवत संप्रदाय ज्ञानपंती व सोपा मार्ग आहे. त्यामुळे विश्वात्मक संत साहित्याच्या माध्यमातून बौध्द, जैन, सुपी तत्वज्ञानाची आम्ही नव्याने ओळख करून देणार आहोत. जातीभेदविरहित देश तयार व्हावा, हे या संमेलनाचे उद्दिष्ट आहे, असेही गोसावी यांनी सांगितले. डॉ. समीरा गुजर यांनी सुत्रसंचालन केले. संमेलनासाठी महाराष्ट्रासह देशभरातील वारकरी, संत साहित्याचे अभ्यासक, साधु-संत उपस्थित होते.
दरम्यान, संमेलानाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी महालक्ष्मी पूजन करण्यात आले. गंथ दिंडी काढण्यात आली. चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलानात दिवसभरात विविध परिसंवादात मान्यवरांनी विचार मांडले.
परदेशी अभ्यासकांची उपस्थिती लक्षवेधी
पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलानात अल्जेरियाचे झरफी एड्डा, युगांडाच्या ऍलिसन नुवाम्पायर, अफगाणिस्तानचे इरफान मोहम्मद अली, नायजेरियाचे मूर्तला अमिनू, इराणच्या पुनेह खाजेह हसनी रबारी आणि भारताचे डॉ. जिगर इनामदार यांनी आपले संत साहित्यावरील शोधनिबंध सादर केले.
‘उजळावया आलो वाटा’ ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
उद्घाटन सोहळय़ात संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती ह. भ. प. डॉ. मदन महाराज गोसावी लिखित ‘उजळावया आलो वाटा’ या ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. विठ्ठल-रूक्मिणीची मूर्ती, फेटा व शाल देवून राज्यपाल कोश्यारी यांचा संमेलनाध्यक्ष डॉ. गोसावी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.