ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उत्तराखंड, नेपाळ आणि अरुणाचल प्रदेशातील सीमा वादानंतर आता चीनने उभारलेल्या मॉडेल व्हिलेजवरून वाद निर्माण होऊ लागला आहे. काही दिवसांपासून चीन भारताच्या सीमेजवळ मॉडेल व्हिलेज उभारत असून, या मॉडेल व्हिलेजच्या आडून चिन सैन्यासाठी बंकर तयार करण्यात गुंतला असल्याचीही माहिती समोर आली आहे.
चीन या मॉडेल व्हिलेजच्या विकासाच्या आडून सीमेपर्यंत पक्के रस्ते तयार करुन घेत आहे. तर डोकलाम इथं फेस ऑफनंतर भारत-चीन यांच्या सैन्यात चकमक सुरुच आहे. मागील 6 महिन्यात भारत-चीन दोन्ही सैन्य एकमेकांच्या आमनेसामने आले आहेत. परंतु लष्कराकडून याबाबत कुठलीही माहिती जाहीर करण्यात येत नाही.
दरम्यान, डोकलाम फेस ऑफनंतर चीनने सिक्किमजवळील तिबेटमध्ये स्वत:ची ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. चीनने सिक्किमनजीक 2017 पासून वेगाने रस्ते आणि बांधकामाला सुरुवात केली आहे. आता चीनने भारतीय सीमेवर तिबेटी वंशाच्या लोकांना तैनात करण्यास सुरुवात केली आहे.