टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारत संघबांधणीवर भर देणार, फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर दोन्ही संघांकडून धावांची आतषबाजी अपेक्षित
वृत्तसंस्था / अहमदाबाद
पाहुण्या इंग्लिश संघाविरुद्ध 5 सामन्यांची क्रिकेट मालिका आज (शुक्रवार दि. 12) पहिल्या टी-20 लढतीच्या माध्यमाने सुरु होत असताना भारतीय संघ आगामी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संघबांधणीला अंतिम स्वरुप देण्याच्या दिशेने प्रयत्नशील असेल. यंदाची आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबरमध्ये होत असून त्यादृष्टीने मुख्य खेळाडूंचा गट निश्चित होणे अपेक्षित आहे. आजच्या पहिल्या टी-20 सामन्याला सायंकाळी 7 वाजता सुरुवात होईल.
इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाविरुद्ध मर्यादित षटकांच्या या मालिकेत विराटसेना उत्तम वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेसाठी फलंदाजीला पोषक खेळपट्टी असेल, असे प्रथमदर्शनी संकेत आहेत.
‘आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा भारतातच होत आहे. त्या पार्श्वभूमीवर, ही मालिका आमच्यासाठी विशेष महत्त्वाची असेल. विश्वचषकाच्या दृष्टीने येथे उत्तम सराव होऊ शकेल’, असे इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जोस बटलर याने अलीकडेच म्हटले होते. भारतीय उपकर्णधार रोहित शर्माने मात्र तूर्तास या मालिकेवर आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचे नमूद केले आहे.
‘जर आपण वर्तमानावर अधिक लक्ष केंद्रित केले तर भविष्याची आपसूकच काळजी घेतली जाईल. ही प्रदीर्घ मालिका आहे आणि प्रत्येक खेळाडूचा वैयक्तिक स्तरावर व एकंदरीत सांघिक खेळ कसा होईल, हे महत्त्वाचे असणार आहे’, असे रोहित म्हणाला.
यंदा या मालिकेच्या पार्श्वभूमीवर संघातील जवळपास प्रत्येक जागेवर किमान दोन दावेदार असल्याने भारतीय संघव्यवस्थापनासमोर निवडीचा पेच असणार आहे. 2019 वर्ल्डकपमध्ये भारताचे जणू हात पोळून निघाले होते. त्यापासून बोध घेण्याची येथे गरज आहे. 2019 च्या विश्वचषकात भारताकडे चौथ्या क्रमांकावर खेळू शकणारा स्थिर फलंदाज नव्हता. त्या पार्श्वभूमीवर, विराट कोहली व रवी शास्त्री यांनी अधिक सुस्पष्टता आणणे विशेष महत्त्वाचे ठरणार आहे.
अहमदाबादमध्ये मर्यादित षटकांच्या या क्रिकेट मालिकेत फलंदाजीला पोषक खेळपट्टी असेल, असे संकेत आहेत. त्यामुळे, भारताकडून उपकर्णधार रोहित शर्मा, रिषभ पंत, हार्दिक पंडय़ा तर इंग्लंडकडून कर्णधार मॉर्गन, बेन स्टोक्स, जोस बटलर, डेव्हिड मलान, जेसॉन रॉय यांच्याकडून फटकेबाजीची अपेक्षा गैर ठरु नये.
इंग्लंडचा संघ मजबूत
बेन स्टोक्स, सॅम करण, आयपीएल लिलावात चर्चेत राहिलेला मोईन अली यांची क्षमता कोणत्याही सामन्याचे चित्र बदलून टाकणारी आहे. शिवाय, जोफ्रा आर्चर, मार्क वूड, ख्रिस जॉर्डन, आदिल रशिद असे दमदार खेळाडू हाताशी असल्याने इंग्लंडचे आव्हान तगडे असेल, हे निश्चित आहे. आगामी आठवडाभरात भारत व इंग्लंडचे संघ आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने कशी तयारी करत आहेत, हे देखील या 5 सामन्यांच्या मालिकेत दिसून येणार आहे.
भारत-इंग्लंड मर्यादित षटकांच्या मालिकेची रुपरेषा
तारीख लढत वेळ ठिकाण
- 12 मार्च पहिली टी-20 सायं. 7 वा. अहमदाबाद
- 14 मार्च दुसरी टी-20 सायं. 7 वा. अहमदाबाद
- 16 मार्च तिसरी टी-20 सायं. 7 वा. अहमदाबाद
- 18 मार्च चौथी टी-20 सायं. 7 वा. अहमदाबाद
- 20 मार्च पाचवी टी-20 सायं. 7 वा. अहमदाबाद
वनडे मालिका
- तारीख लढत वेळ ठिकाण
- 23 मार्च पहिली वनडे दुपारी 1.30 वा. पुणे
- 26 मार्च दुसरी वनडे दुपारी 1.30 वा. पुणे
- 28 मार्च तिसरी वनडे दुपारी 1.30 वा. पुणे
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, दीपक चहर, राहुल तेवातिया, इशान किशन (राखीव यष्टीरक्षक).
इंग्लंड : इयॉन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर, जेसॉन रॉय, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल रशिद, रीस टॉपली, ख्रिस जॉर्डन, मार्क वूड, सॅम करण, टॉम करण, सॅम बिलिंग्ज, जॉनी बेअरस्टो, जोफ्रा आर्चर.
सामन्याची वेळ : सायं. 7 पासून.
रोहितचा सहकारी सलामीवीर कोण? केएल राहुल की शिखर धवन?
उपकर्णधार रोहित शर्माचा सहकारी सलामीवीर कोण असेल, हा सर्वात मोठा पेच भारतीय संघव्यवस्थापनाला सोडवावा लागणार आहे. आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय विशेष महत्त्वाचा ठरु शकतो. एकीकडे, केएल राहुलची फटक्यांची निवड उत्तम असते. पण, दुसरीकडे, शिखर धवनची फलंदाजी आयसीसी स्पर्धांमध्येच अधिक बहरते, हा इतिहासही आहे.
श्रेयस, सुर्यकुमारला संधी मिळणार का?
कोहलीने रोहितसह धवनला सलामीला उतरवण्याचा निर्णय घेतला तर केएल राहुल चौथ्या स्थानी खेळण्याची शक्यता असेल. अर्थात, केएल राहुल व शिखर धवन या दोघांनाही खेळवले तर श्रेयस अय्यर किंवा सुर्यकुमार यादवसारख्या खेळाडूंना संधी मिळणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. श्रेयस, सुर्यकुमार चौथ्या किंवा पाचव्या स्थानी विस्फोटक फलंदाजी करु शकतात. त्यामुळे या दोघांपैकी किमान एक जण संघात असणे भारतासाठी महत्त्वाचे ठरु शकते.
गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमारकडे
युवा सनसनाटी गोलंदाज टी. नटराजन मोक्याच्या क्षणी दुखापतीमुळे संघातून बाहेर फेकला गेल्यानंतर भुवनेश्वर कुमारकडे जलद गोलंदाजीची मुख्य धुरा असेल, हे निश्चित आहे. त्याच्या साथीला शार्दुल ठाकुर, दीपक चहर, नवदीप सैनी यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, हे पहावे लागेल. फिरकी गोलंदाजीत यजुवेंद्र चहल भारताचे मुख्य अस्त्र असेल. वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल यांचे पर्यायही उपलब्ध असणार आहेत.
एक्स फॅक्टर असलेल्या युवा खेळाडूंना आम्ही मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेसाठी संधी दिली आहे आणि त्यांच्याकडून आक्रमक खेळाची अपेक्षा आहे. वर्ल्डकपपूर्वी ही आमच्यासाठी शेवटची आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका आहे. त्यामुळे, येथील जडणघडण महत्त्वाची असेल.
-भारतीय कर्णधार विराट कोहली
आयपीएल स्पर्धा आमच्यासाठी वरदान ठरली, असे म्हटले तरी गैर ठरणार नाही. आयपीएल स्पर्धेमुळे भारतातील आमचा खेळ अधिक बहरला आहे. याचा फायदा या मालिकेत व नंतर आयसीसी टी-20 विश्वचषकात घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
-इंग्लिश कर्णधार इयॉन मॉर्गन