वृत्तसंस्था/ नवी मुंबई
महिलांच्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेला गुरुवारपासून येथे सुरुवात होत असून खालच्या क्रमांकावर असणाऱया व अपुरी तयारी झालेल्या इराणविरुद्ध भारतीय महिला विजयी सुरुवात करतील, अशी अपेक्षा आहे. या स्पर्धेतून फिफा वर्ल्ड कप प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्याचाही भारताचा प्रयत्न असेल.
1979 नंतर दुसऱयांदा भारतात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून उपांत्यपूर्व फेरी गाठत इतिहास निर्माण करण्यासाठी भारतीय महिला प्रयत्नशील असतील. या स्पर्धेत एकूण 12 संघांनी भाग घेतला आहे. 1979 व 1983 अशा दोन वेळेस भारताने या स्पर्धेचे उपविजेतेपद तर 1981 मध्ये तिसरे स्थान मिळविले होते. डीवाय पाटील स्टेडियमवर होणारा हा सामना भारताने जिंकल्यास गट अ मध्ये भारताचे किमान तिसरे स्थान निश्चित होईल. तीन गटामध्ये पहिले दोन क्रमांक मिळविणारे संघ तसेच तिसरे स्थान मिळविणारे दोन सर्वोत्तम संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. इराण हा अ गटातील सर्वात कमी मानांकन असलेला संघ असून चीन, चिनी तैपेई हे संघही याच गटात आहेत. इराण 70 तर भारत मानांकनात 55 व्या स्थानावर असून इराण पहिल्यांदाच एएफसी आशिया चषक स्पर्धेत खेळत आहे. येथे उपांत्य फेरी गाठणारे व उपांत्यपूर्व फेरीतील दोन सर्वोत्तम संघ 2023 मध्ये होणाऱया महिला विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार आहेत.