अर्जुनाचे एका पायावर उभे राहून केलेले तप फळाला आले. सांब सदाशिव एकदा प्रसन्न झाले की, त्यांच्या भक्ताने मागितलेला वर सहज देऊन टाकतात, अशीच त्यांची ख्याती! पण अर्जुनाने केलेल्या तपाचे तेज इतके तीव्र होते की, त्यामुळे साऱया पशुपक्ष्यादी सजिवांना त्याचा दाह सहन होईना. म्हणून ज्यांना प्रसन्न करण्यासाठी हे तप चालू होते, त्या खुद्द भोळय़ा शंकरांकडे जाऊन ह्या दाहापासून आपले रक्षण करायला सांगण्यासाठी जावे लागले. अर्जुनाला ह्या साऱयाचा काही थांगपत्ता नव्हता. कारण कोणतेही कार्य एकाग्रतेने करायचे हाच त्याचा स्वभाव होता. त्याचे लक्ष फक्त आपल्या लक्ष्याकडे असे. म्हणूनच शिवाने त्या प्राण्यांना अभय दिल्याचेही त्याला कळले नाही. हीच खरी वेळ अर्जुनाची परीक्षा घेण्याची होती. ती शिवशंभोनी बरोबर साधली.
मूक नावाचा कोणी एक दानव होता. आपल्या कुळाला जागून त्याने वराहाचे रूप घेतले. हे दानव, राक्षस बऱयाचदा मायावी शक्ती मिळवून उन्मत्त झालेले असतात. ह्या वराहाने अर्जुनाच्या तपात विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्रास देऊ लागला. अर्जुन सहाजिकच विचलित झाला आणि संतापला. त्या खोडसाळ वराहाला मारण्यासाठी प्रवृत्त झाला. त्याचवेळी एक भिल्ल तिथे आला. तोही त्या वराहाच्याच मागावर आला होता. त्याने आपली शिकार मिळवण्यासाठी त्या वराहावर बाण सोडला. त्याचवेळी अर्जुनानेही बाण सोडला. दोघांचेही बाण त्या वराहाच्या शरीरात घुसून तो मरण पावला होता.
अर्जुन तो रुतलेला बाण काढण्यासाठी पुढे सरसावला. त्याचवेळी भिल्लाच्या वेषातील शंकरांनी एका वनचराला अर्जुनाकडे पाठवले. वनचर म्हणाला, आपण कुणीतरी राजघराण्यातले आहात, असं मला वाटतं. म्हणून एक विनंती करतो,की ‘ह्या रानडुकराच्या शरीरात घुसलेला बाण आमच्या स्वामींचा…शंकरांचा..आहे. आपण थोर पुरुष आहात. तेव्हा त्या शिवबाणाचे असे अपहरण करू नका’. त्यावर अर्जुन म्हणाला, ‘शंकराचा बाण कुठेतरी दडला असेल. हा बाण माझाच आहे. एका शूरवीराला असा दुसऱयाचा बाण अपहरण करण्याची काय गरज? खरे तर मी ह्या वनात राहणारा वनवासी आहे. आम्ही दोघांनीही एकदमच बाण सोडला. त्यामुळे हा शंकराचा बाण आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. वनवासी ह्या नात्याने ह्या रानडुकराची शिकार करण्याचा मला अधिकार आहे.’ तो वनचर ह्या युक्तीवादावर काही बोलला नाही. तो मुकाटय़ाने तिथून निघून गेला आणि त्याने अर्जुनाचे बोलणे शंकरांना जाऊन सांगितले.
शंकरानी ते ऐकून आपल्या काही सैनिकांना (गणांना) अर्जुनाकडे पाठवले. त्यांनी अर्जुनाबरोबर युद्ध केले. अर्जुनाने त्यांचा पराभव केला. नंतर शिवांनी आपला मुलगा कार्तिकेयाला युद्धासाठी पाठवला. अर्जुनाने त्यालाही पराभूत केले.
शेवटी स्वतः शंकरच युद्धासाठी निघाले…..
करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा ।श्रवणनयनजं वा मानसं वापराधम्।
विहितं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व।जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो।।
हे भगवान महादेव, कृपया माझे हात, पाय, वाणी, शरीर वा शरीराचे कर्म करणाऱया कोणत्याही अंगाने किंवा कान, डोळे अथवा मनाद्वारे झालेल्या सर्व अपराधांसाठी क्षमा करा. तुम्ही तर करुणेचा सागर आहात. हे शिवशंभो तुमचा जयजयकार असो!……अर्जुनानेही मनातल्या मनात अशीच प्रार्थना केली असावी!